
आंगणेवाडी; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात कोकणच्या विकासासाठी काहीच केले नाही, केवळ थापाच मारल्या. कोकणाने त्यांना इतकी वर्षे आशीर्वाद दिले, मात्र त्यांनी संधी असूनही कोकणकडे पाठच फिरवली. हेच ठाकरेंचे कोकणवरील बेगडी प्रेम दिसून येते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. केंद्र आणि राज्य सरकार सिंधुदुर्ग आणि कोकणकडे अधिक लक्ष देऊन काम करेल. कोकणच्या पर्यटन विकासाला गती दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी आंगणेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेला केंद्रीयमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ.आशिष शेलार, आ. प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ना. नारायण राणे केंद्रीयमंत्री झाल्यानंतर आणि ना. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजपमध्ये सिंधुदुर्गात नवी ऊर्जा आली आहे. ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना चांदा ते बांदा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते, व इतर पायाभूत सुविधा निर्माण केला. मात्र ठाकरे सरकारने कोणतीही योजना आणली नाही. ना. फडणवीस म्हणाले, ग्रीन रिफायनरीला आडकाठी आणण्याचे काम ठाकरेंनी केले; मात्र आम्ही तो आणणारच. 1 लाखापेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार होता. विरोधकांनी अक्षरश: खोटं सांगून लोकांना भयभीत केले, असा आरोप त्यांनी केला.