
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामासंदर्भात जनआक्रोश समितीच्या लढ्याला मोठे यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात प्रगतीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. जनआक्रोश समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी रविवारी ना. चव्हाण यांची भेट घेतली. या नंतर त्यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती समितीचे मुख्य प्रवक्ते अॅड. ओवेस पेचकर यांनी दिली. मंत्रालयातील समिती सभागृहात सकाळी 9 वाजता महामार्ग चौपदरीकरणाबाबत ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार जयंत पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आमदार प्रसाद लाड, आ. अनिकेत तटकरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेंद्र थोरवे, आ. महेश बालदी, आ. अदिती तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रविशेठ पाटील, आ. भास्करशेठ जाधव, आ. योगेश कदम, आ. राजन साळवी, आ. शेखर निकम, आ. महेंद्र दळवी आदींसह सार्वनकि बांधकाम विभागाचे सचिव, महामार्गाशी संबंधित अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.