
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्यापासून आंबा मोठ्या प्रमाणात मोठ्या बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात मोठी बाजारपेठेत असलेल्या एपीएमसी मार्केटमध्येदेखील राज्यभरातून आंबा दाखल होत आहे. त्यामुळे आब्यांचे चढे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणातून विविध जातीचे आंबे एपीएमसी परिसरात दाखल झाले आहेत.
रत्नागिरीचा हापूस आणि देवगड आंब्यांबरोबरच अन्य राज्यातील आंबाही येथील बाजारपेठेत दाखल होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यातून कर्नाटक आणि केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.
सध्या आंब्याचे दर चढे आहेत, पण आवक जशी वाढले तसे दर कमी होण्याचे संकेत येथील विक्रेत्यांकडून दिले जात आहेत. दरम्यान हंगामाच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण झाली होती.. त्यात काही परिसरात तापमानातील उच्चांकामुळे आंब्यावर काळे डागदेखील पडले आहेत. मात्र, त्याचा फटका बसूनही आंब्यांच्या दर मात्र अजूनही चढेच आहेत.
- हापूस एक डझन : ८००, १००० ते १२०० रुपये
- एका पेटीसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये
- कर्नाटकी हापूस : डझनाचा दर ६५० ते ११०० रुपये
- दोन डझन बॉक्सचा दर बाराशे ते दोन हजार