लांजा; पुढारी वृत्तसेवा : आजीचा वाढदिवस आणि उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भांबेड येथील मुचकुंदी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. ११) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयत दोघेजण घोसाळकर आणि तांबळे या कुटुंबातील आहेत.

याप्रकरणी लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या विरार पूर्व येथे राहणारी संगीता ही महिला आपल्या मुली मयुरी कमलेश घोसाळकर (वय १५) तसेच प्रतीक्षा कमलेश घोसाळकर (वय १२) यांच्यासह गावी आल्या होत्या. त्यांच्यासोबत सुशील गुंडाप्पा तांबळे (वय १४) आणि तन्मय गुंडाप्पा तांबळे ( वय १०, दोघे राहणार वरळी नाका मुंबई) हे देखील आले होते. संगीता पवार यांची आई वनिता तुकाराम पवार (वय ६६) यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने त्या ९ एप्रिल रोजी चारचाकीने मुंबईहून गोविळ बौध्दवाडी येथे आले होते.

मंगळवारी दुपारी जेवण आटोपून हे सर्वजण मुचकुंदी नदीवर भांबेड येथे आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत वनिता पवार तसेच कारचालक रुपेश कोंडीभाऊ कंदारे असे एकूण सातजण नदीवर गेले होते. कपडे धुणे सुरुवात केली असताना नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी प्रथम मयुरी घोसाळकर हिने नदीत उडी मारली. मात्र नदी पात्राचा व नदीतील मोठ्या कोंडीचा (कातळकडा) अंदाज न आल्याने ती पाण्यात गटांगळा खाऊ लागली. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत मयुरी हिने आपल्या आईला हाका मारल्या. तो आरडाओरडा ऐकून सुशील तांबळे याने या नदीपात्रात उडी मारली. मात्र ही दोघेही या नदीपात्रात बुडाली आणि त्यांचा या नदीपात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर तालुक्यातून हळूहळू व्यक्त केली जात असून लांजा पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here