
रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील भाट्ये येथील खाडीत बुडून अल्पवयीन मुलगा आणि तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रेहान अब्दुल्ला शेख (वय ११, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) आणि प्रणय रघुनाथ जाधव ( वय २४, रा.कोकणनगर, मराठी शाळेजवळ, रत्नागिरी) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मतीन अमीरुद्दीन सोलकर (वय ३८, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी अडीचच्या सुमारास रेहान शेख आणि प्रणय जाधव हे दोघे भाट्ये येथील खाडीत बुडत होते. हे पाहून तिथे जवळच उभ्या असलेला अबुबखर अब्दुल्ला शेख (वय ८) हा मोठ्याने ओरडला. त्याचे ओरडणे ऐकून राजीवडा येथे राहणारे अमीरुद्दीन सोलकर आणि दिलदार कासम पावसकर यांनी पाण्यात उडी मारून रेहान शेख आणि प्रणय जाधव यांना पाण्यातून बाहेर काढले.
बेशुद्ध झाल्याने दोघांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. गोविंद आंबाडे यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृत दोघांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.
हेही वाचा