
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रविवारी रात्री कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली असताना बंगालच्या उपसागरात विकसित होऊ घातलेल्या ‘मोका’ चक्रीवादळामुळे वादळी वार्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील भागांना 11 मेपर्यंत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला असताना या बाबत कोकण किनारपट्टी भागातही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. दरम्यान, ‘मोका’चा प्रभाव कोकण किनारी भगात जाणवणार नसला तरी आगामी दोन दिवस मळभी वातावरण राहणार आहे. तसेच हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली. तसेच रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागतही पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यामुळे कोकणातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात विविध भगात मळभी वातावरणाचा खेळ सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे तापमानात उतार झाल्याने उकाडा कमी जाणवत होता. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काहिशी घट झाली आहे. मात्र, आद्रतेमुळे उकाडा कायम आहे. रत्नागिरीत सोमवारी सकाळी कमाल तापमान 35 ते 36 अंशापर्यंत होते. मात्र, रविवारी रात्री पाऊस झाल्याने किमान तापमानाचा पारा घसरला होता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वादळी आणि तसेच मे नंतर वार्याची दिशा बदलण्यास सुरूवात होईल. यामुळे तापमान वाढणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या हवाई संदेशात नमुद केली आहे.
दरम्यान, मोका चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार नसला तरी सोमवारी त्याच्या प्रभावाने मळभाचे आच्छादन कायम होते. ‘मोका’मुळे किनारी भागात धोका नसला तरी सावधगीरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मळभ असले तरी हलक्या पावसाचा ‘ग्रीन अलर्ट’ येथे जारी करण्यात आला आहे.