Tauktae Cyclone Updates : केरळ, कर्नाटकपाठोपाठ तौत्के चक्रीवादळाचा तडाखा अखेर रविवारी (ता.१६) महाराष्ट्र, गोवा या राज्यांना बसला. अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळाने भीषण रुप धारण केले असून हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासूनच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई जाणवू लागला. वादळ पुढे सरकेल तसे मुंबईत जोरदार वारे देखील बघू शकतील, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. (tauktae cyclone live updates Mumbai Kokan Maharashtra Gujarat IMD)
-
समुद्रात उंच लाटा तर घाट भागात जोरदार पावसाची शक्यता
तौक्ते चक्रीवादळाचे केंद्र मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर अरबी समुद्रात आहे. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळी वारे आणि समुद्राच्या उंच लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि घाट क्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, काही ठिकाणी मोठ्या सरी बरसतील. त्यामुळे सोमवारी दिवसभर घाटातून प्रवास करणे टाळावे, किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, विजेचे खांब कोसळणे, विजेच्या तारा, होर्डिंग्ज, कच्च्या भिंती पडणे, तसेच घरांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडू शकतील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
नाशिकमधील अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

-
रत्नागिरी, सिंधुदुर्गला मोठा तडाखा; अनेक गावांना फटका
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी (ता.१६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला. चक्रीवादळाच्या प्रभावाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टी भागात कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. मुंबईतही पाऊस कोसळत आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्यात अद्यापही पाऊस कोसळत आहे. या वादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते वादळ सोमवारी (ता. १७) संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर जाणाऱ्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूरसह विदर्भातही पाऊस कोसळला. काल दुपारी चक्रीवादळाच्या गतीत बदल झाल्याने त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचा फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. काल रात्रीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस झाला. दुपारी हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातून रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकले. जिल्ह्यात सुमारे ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व खबरदारीमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण १३७ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
Also Read: Corona : ग्रामीण भागासाठी केंद्राची नवी नियमावली
-
भारतीय हवाई दलाची C-130J आणि An-32 ही दोन विमाने १६७ जवानांसह १६.६ टन आवश्यक साहित्य घेऊन कोलकात्याहून अहमदाबादकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे.
Indian Air Force had deployed two C-130J and a An-32 aircraft for transportation of 167 personnel and 16.5 tonnes of load of NDRF from Kolkata to Ahmedabad: IAF#CycloneTauktae pic.twitter.com/lNLEXiQrP8
— ANI (@ANI) May 17, 2021
-
अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर
तौक्ते या चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. सोमवारी (ता. १७) संध्याकाळी ते गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज असून १८ तारखेला सकाळी ते भावनगरच्या पुढे जाईल, असे सांगण्यात आले आहे. गुजरात तसेच, दीव-दमणसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. १८ मेपर्यंत चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १५० ते १६० पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाताना चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी ७०-८० किमी इतका आहे.
Esakal