पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून महाविकासआघाडी सराकारवर टीका केली आहे. ”रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय. आरक्षण इथल्या शोषित आणि मागासलेल्या समाजासाठी न्यायाचा आधार आहे. बहूजनांच्या हिताच्या बाबतीत सरकार सतत गळचेपीचं धोरण राबवत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेण्याचा कोणताच नैतिक अधिकार महाविकास आघाडीला आता राहिलेला नाही.” अशा शब्दात पडळकरांनी सरकारवर टीका केली आहे.
Also Read: पुणे : दहा महिन्यांच्या वेदिकाला उपचारांसाठी १६ कोटींचा खर्च!


Also Read: उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये सर्वपक्षीय शेतकऱ्यांची एकजूट
पडळकर यांनी पत्रात म्हंटले आहे की, ”दादा! तुमचा पक्ष आपल्याच पई पाव्हण्यांचा आणि त्यांच्याच हिताचा विचार करणारा आहे, त्याविषयी माझी काही तक्रार नाही, पण तुम्ही आता महत्वाच्या वैधानिक पदावर आहात ह्याचे भान ठेवावे व सर्वसमावेशक निर्णय घेतले पाहिजे, पण दुर्दैवानं असं घडत नाहीये. म्हणून मला तुमचे लक्ष आपण आता नव्याने काढलेल्या पदोन्नती बाबतच्या ०७ मे २०२१ रोजीच्या शासनाच्या निर्णयाकडे (GR) वेधायचे आहे.
मा. उच्च न्यायालयाने ४. ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयामुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले होते, म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात २०१६ मध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली व त्या अनुसरून १९ डिसेंबर २०१७ ला पदोन्नतीबाबत मागासवर्गीय प्रवर्गातील पदे रिक्त ठेऊन केवळ खुल्या प्रवर्गातील रिक्त पदोन्नतीची पदे भरण्याचा काळजीपूर्वक निर्णय घेतला. परंतु तुमच्या प्रस्थापितांच्या महाविकास आघाडी सरकारनं या निर्णयाला केराची टोपली दाखवली आणि सर्वात पहिल्यांदा १८ फ्रेब्रुवारी २०२१ ला अन्यायकारक GR काढून राज्यात मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा कोणताही विचार न करता २५ मे२००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती भरण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णय बहुजनांवर प्रंचड अन्याय कारक होता, त्याला विरोध झाल्यानंतर परत २० एप्रील २०२१ रोजी नवा GR काढला. आता परत ०७ मे २०२१ रोजी गोंधळात टाकणारा नवीन GR काढला आहे. यातही बहुजनांना भविष्यात आरक्षण कसे मिळणार नाही, याचीच रितसर सोय करून ठेवली आहे. एवढंच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ घेऊन सेवाज्येष्ठतेनुसार वरचे स्थान मिळाले आहे, त्याला सुद्धा ‘रेट्रोस्पेक्टीव्ह इफेक्ट’ देऊन पुढील सेवाजेष्ठतेचा लाभही थांबवलेला आहे.”
”तुम्हाला आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? की बारामतीची जहागिरी?इतकेच नव्हे तर आपल्या प्रस्थापित सरकारने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिकेमध्ये जमा करायची कागदपत्रे आणि प्रमाणित डेटा (quantifiable data) सुद्धा आजतागायत जमा केलेला नाही, तसेच कोणताही निष्णात वकील ही नेमलेला नाही, यावरूनच आपल्या मनातील बहुजनांप्रतिचा आकस दिसून येतो. कदाचित तुम्हाला तुमच्या मर्जीतल्या काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून टक्केवारी सरकारची वसूली वाढवायची म्हणून हा निर्णय घेतला असावा असा समान्य जनतेला प्रश्न पडतोय.आरक्षणाची गळचेपी करणारा शासन निर्णय काढणाऱ्या प्रस्थापितांच्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो…धिक्कार करतो.” अशा शब्दात टीका करुन पडळकर यांनी रोष व्यक्त केला.
दरम्यान, सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायलयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून मागासवर्गीयांच्या आरक्षणाची ३३ टक्के पदोन्नीची रिक्त पदे आरक्षित कोट्यातून बिंदू नामावलीनुसार भरण्याबाबत तात्काळ आदेश काढावा आणि १८ फेब्रुवारीचा २०२१, २० एप्रिल २०२१ व ७ मे २०२१ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा २५ मे पासून मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करेल” असा इशारा पडळकर यांनी यावेळी दिला
.
शिवाजीनगर- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीशी सर्वात पुढच्या फळीत लढत आहेत डॉ . देवयानी गावंडे . मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या डॉ . देवयानी ह्यांची कोरोना सुरु झाल्यानंतर पुण्यात मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कोरोना तपासणी केंद्रामध्ये नियुक्ती झाली . (corona news doctor devyani gavande working in health centre)
पुण्यात सर्वच अनोळखी असताना इथे राहण्यापासून सर्वच गोष्टींची सोय करणं कठीण काम होतं . सर्व गोष्टींची सोय करणे आणि कोरोना तपासणी केंद्रामध्ये रुग्णांना तपासणे , त्यांना समजून घेणे व समजावून सांगणे हे अनुभव खूप काही शिकवणारे होते. त्यानंतर सप्टेंबर २०२० ला जनवाडी येथील सावित्रीबाई फुले कोरोना तपासणी केंद्राची (स्वॅब सेंटरची) जबाबदारी त्यांना देण्यात आली . लोकांची कोरोना तपासणी करणे , कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांची प्रकृती तपासणे , त्यांना दवाखान्यात भरती करण्याची गरज आहे की नाही ते पाहणे , त्यांना दवाखान्यात बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणे . वरवर पाहता ह्या सर्व नियमित घडणाऱ्या गोष्टी वाटतात . परंतु आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडून गोष्टी पाहिल्या तर आपल्याला त्याची तीव्रता लक्षात येते .
Also Read: पुणे : ग्रामीण प्रशासनाने कोविडबाबत सतर्क रहावे : गृहमंत्री
ही स्वॅब सेंटरवर येणारी लोकं ही जास्त करुन जवळील वस्त्यांमधून येतात . त्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती , अनेक लोकांना दवाखान्यांबद्दल , आजाराविषयी वाटणारी भीती दिसते . ह्या सर्व गोष्टी रुग्णांकडून जाणून घेऊन त्यांना समाजावून सांगताना डॉ . देवयानी आपल्याला दिसतात . मागील महिन्यात कोरोनाचा वाढता प्रसार , त्यातून सेंटरवर रुग्णांचा वाढता भार यामुळे काही वेळा लोकांनी वादविवादही केले . परंतु रुग्णसेवा हीच प्रथमस्थानी ठेवून त्या कार्य करत राहिल्या . सोबत काम करणारे कर्मचारी सांगतात की मागील महिन्यात असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी ३ ते ४ पेशंट गंभीर परिस्थितीत नाही . अशावेळी डॉक्टर पळत जाऊन रुग्णांवर उपचार सुरु करत आणि त्यांच्यासाठी तातडीने बेड उपलब्ध करुन देत . त्यांच्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. एक म्हातारी व्यक्ती ज्यांच्या मागे पुढे कुणी नाही, डॉक्टरांना मुलगी मानून खांद्यावर डोकं ठेवून रडल्या.
Also Read: पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची ‘ती’ इच्छा…
डॉ . देवयानी सांगतात , ” त्या डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडत असताना सर्व सहकाऱ्यासोबत (स्टाफसोबत) मिळून मिसळून कामे करतात . तरी त्या म्हणतात “ मी माणूस म्हणून अनेक गोष्टी शिकत आहे .लोकांच्या अशा विश्वासाने काम करण्याची प्रचंड ऊर्जा मिळते . लोकांचं आजारपण कमी करुन , मानसिक ताण कमी करुन एक प्रकारे आपण देशसेवाच करतो . त्यातून समाधान मिळते . लोकांची मनापासून सेवा करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली . त्यांच्या आई त्यांना म्हणतात , “ आता तू डॉक्टर होत आहेस , आपण समाजाचं देणं लागतो , हे कायम लक्षात ठेव .
Esakal