पुणे – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप (Sugarcane Galap) झाले आहे. यातून १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात ५५० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. राज्यात चार साखर कारखाने (Sugar Factory) सुरू असून, येत्या तीन-चार दिवसांत यंदाचा हंगाम संपेल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी दिली. (One Million Tons of Sugar Production Maharashtra State)
राज्यात यंदाच्या २०२०-२१ च्या हंगामात ९५ सहकारी आणि ९५ खासगी असा एकूण १९० कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतले. त्यापैकी १८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. औरंगाबाद विभागातील जालना जिल्ह्यासह तीन साखर कारखाने आणि नगर विभागातील एका कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरू आहे. तेथील हंगामही चार दिवसांत पूर्ण होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील गाळप हंगाम
पुणे जिल्ह्यात यंदा बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव साखर कारखाना, इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील, नीरा भीमा, जुन्नर तालुक्यातील विघ्नहर, भोर तालुक्यातील राजगड, मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम, शिरूर तालुक्यातील घोडगंगा, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर या दहा सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. तर, दौंड तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर्स, दौंड शुगर, इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो, शिरूर तालुक्यातील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स आणि पराग ॲग्रो फूड्स या सहा खासगी कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गाळप
यंदा कोल्हापूर विभागात साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे. तर, पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून, सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के इतका आहे.
Esakal