गेल्या आठवड्यात आपण कांचीपुरमच्या सर्वात पुरातन मंदिराची, म्हणजे ‘कैलासनाथार कोविल’ची, ओळख करून घेतली. आजही आपण कांचीपुरममधल्याच अजून एका अप्रतिम मंदिराचं दर्शन घेणार आहोत. पल्लवसाम्राज्य हे आजच्या तामिळनाडूमधील तीन प्राचीन साम्राज्यांपैकी एक. त्यांची पहिली राजधानी होती चेन्नईजवळील मामल्लापुरम किंवा महाबलीपुरम आणि त्यानंतरची राजधानी म्हणजे कांचीपुरम. पल्लवसाम्राज्याच्या भरभराटीच्या काळात कांचीपुरम भौतिक आणि सांस्कृतिक प्रगतीच्या शिखरावर होतं. साधारणतः इसवीसनाचं चौथं शतक ते नववं शतक हा पल्लवांचा उत्कर्षकाळ; पण त्यानंतर राष्ट्रकूट आणि चोळ/चोल इत्यादी राजवटींचं मांडलिकत्व पल्लवांनी पत्करूनही कांचीपुरमचं वैभव कुठंही कमी झालं नाही. अगदी आजही कांचीपुरमचा उल्लेख ‘हजार मंदिरांचं शहर’ असाच केला जातो.

पल्लवांनी कांचीपुरममध्ये अनेक मंदिरं बांधली होती. त्या मंदिरांचा जीर्णोद्धार तर पुढच्या चोळ, राष्ट्रकूट, चेर वगैरे राजवटींनी केलाच; पण कांचीमध्ये नवनवीन मंदिरं बांधली, जुन्या मंदिरांचा विस्तार केला, त्यांना सढळ हस्ते दाने दिली. कुठल्याही जेत्या राजानं पराभूत राजाची राजधानी लुटली वा उद्ध्वस्त केली नाही. त्याला कारण भारतीय संस्कृतीची अंगभूत सहिष्णुता. राजधानी लुटणं, मंदिरं उद्ध्वस्त करणं, बायका-मुलांना गुलाम म्हणून विकणं, मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांची कत्तल करणं वगैरे क्रूर प्रकार सुरू झाले ते अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याच्या दक्षिण स्वारीनंतर.

त्याआधीच्या भारतीय साम्राज्यांनी एकमेकांच्या संस्कृतीचा सदैव सन्मानच केला. युद्ध रणांगणापुरतंच मर्यादित राहिलं.

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते वरदराज पेरुमलमंदिर या सांस्कृतिक सहिष्णुतेचा आजही भक्कम उभा असलेला पुरावा आहे. तब्बल २३ एकरांचा विस्तार असलेला या मंदिराचा प्राकार म्हणजे पल्लवांपासून ते विजयनगर साम्राज्यापर्यंतच्या हिंदुमंदिरबांधणीचा एक जिवंत आलेख आहे.

Varadraj Perumal

हे मंदिर प्रथम उभारलं ते पल्लव राजांनी; पण आजचं जे मुख्य मंदिर दिसतं ते इसवीसन १०५३ मध्ये चोळ राजांनी बांधलेलं आहे. पुढं चोळ वंशातल्याच राजा कुलोत्तुंग पहिला आणि विक्रमराज चोळ यांनी बाराव्या शतकात या मंदिराचा विस्तार केला आणि काही भागाचं नूतनीकरणही केलं. कांचीपुरम शहरातील श्रीविष्णूचं हे सगळ्यात जुनं मंदिर. वरदराज पेरुमलमंदिरात भगवान विष्णूची ‘देवराजस्वामी’ या नावानं उपासना केली जाते. पूर्ण विकसित द्रविड मंदिरस्थापत्यशैलीचं हे मंदिर एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

आपण या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला प्रथम दिसतं ते उत्तुंग सातमजली रायगोपुरम. त्या गोपुराखालच्या भव्य दरवाजातून आपण मंदिराच्या प्राकारात प्रवेश करतो आणि मंदिराच्या प्राकाराची भव्यता आपल्याला खऱ्या अर्थानं जाणवते. वरदराज पेरुमलमंदिरात एकात एक असे तीन भव्य प्राकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे तमिळ वैष्णव संतकवी आळवा यांच्या वास्तव्यानं पुनित झालेला आळवार-प्राकार, दुसरा म्हणजे मंदिराचं पवित्र स्वयंपाकघर जिथं आहे तो माडपल्ली-प्राकार आणि सगळ्यात आतला म्हणजे मुख्य मंदिराचा तो थिरुमलई म्हणजे पवित्र पर्वत-प्राकार. हे तिन्ही प्राकार मिळून वरदराज पेरुमलमंदिरसमूहात लहान-मोठी बत्तीस मंदिरं, एकोणीस विमानं, तीनशेच्या वर कोरीव खांबांच्या ओवऱ्या आणि लहान-मोठे मंडप व कित्येक लहान-मोठ्या पुष्करिणी आहेत. हे पूर्ण मंदिर बारकाईनं बघायला गेलो तर एक दिवस पुरणार नाही.

तमिळ श्रीवैष्णव संप्रदायातल्या भाविक

लोकांसाठी ज्याप्रमाणे श्रीरंगमचं मंदिर म्हणजेच ‘कोविल’, तिरुमलाचं मंदिर म्हणजे ‘मलई’ किंवा पवित्र डोंगर, त्याचप्रमाणे हे कांचीचं वरदराज पेरुमलमंदिर म्हणजे ‘पेरुमाळ कोविल’. दिव्य देसम म्हणजे ज्या मंदिरांमधून तामिळ वैष्णव संतकवींनी काव्यरचना केली अशी श्रीविष्णूची १०८ अतिपवित्र मंदिरं. त्या मंदिरांमधलं हे तिसऱ्या क्रमांकाचं मंदिर.

या मंदिरातली एक मुख्य आराध्यमूर्ती ही औदुंबराच्या लाकडापासून म्हणजे तमिळमध्ये ‘आती’ या नावाच्या वृक्षाच्या लाकडापासून बनवलेली आहे म्हणून तिला ‘आतीवरदार’ असं नाव आहे. पुढं सतराव्या शतकात औरंगजेबाच्या स्वारीच्या भीतीनं ही मूर्ती मंदिराच्या पुष्करिणीखाली असलेल्या एका गुप्त दालनात दडवण्यात आली. ही मूर्ती दर ४० वर्षांनी बाहेर काढली जाते आणि ४८ दिवस या मूर्तीचा दर्शनोत्सव साजरा केला जातो. देश-विदेशांतून लाखो भक्त या मूर्तीच्या दर्शनासाठी कांचीपुरमला येतात. शेवटचा आतीवरदार दर्शनसोहळा २०१९ मध्ये पार पडला, आता यापुढचा दर्शनसोहळा २०५९या वर्षी साजरा होणार आहे.

सध्या या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जी ‘मूळवर’ म्हणजे मुख्य मूर्ती आहे ती गंडकी पाषाणाची आहे. उभ्या अवस्थेतली ही श्रीविष्णूची सुंदर मूर्ती जवळजवळ दहा फूट उंच असून पाषाणाच्या एकाच शिळेतून कोरलेली आहे. या मंदिराच्या प्राकारात तीनशेहून अधिक शिलालेख आहेत जे पल्लव, पांड्य, चोळ, होयसळ, विजयनगर इत्यादी दक्षिणेतल्या सर्व साम्राज्यांच्या राजवटीतले आहेत. या सर्वच राजवटींनी वेगवेगळ्या काळात ह्या मंदिराचा विस्तार केला होता, दाने दिली होती किंवा देवाला दाग-दागिने अर्पण केले होते. ब्रिटिश राजवटीत लॉर्ड क्लाईव्हही वरदराज पेरुमलमंदिरात दर्शनासाठी आला होता आणि त्यानं देवाला एक हार अर्पण केला होता. ‘क्लाईव्ह महारकंडी’ या नावानं ओळखला जाणारा हा रत्नजडित हार आजही वर्षातून एकदा इथल्या उत्सवमूर्तीच्या अंगावर चढवला जातो.

हे मंदिर शिल्पसौंदर्यानं विनटलेलं आहे. विजयनगरच्या सम्राटांनी बांधलेला इथला १०० कोरीव स्तंभांचा कल्याणमंडप अत्यंत सुरेख आहे. प्रत्येक खांबावर अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. रती-मदन, अर्जुन, कर्ण, घोड्यावर बसलेल्या

स्त्री-सैनिक वगैरे मूर्ती निव्वळ अप्रतिम. दुर्दैवानं पुरातत्त्‍व खात्यानं सुरक्षेच्या नावाखाली या कल्याणमंडपाला अत्यंत कुरूप असे बोजड लोखंडी ग्रिल्स ठोकून ठेवलेत. या मंडपाच्या शिल्पसौंदर्याशी ते पूर्णतः विसंगत आहेत. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या खांबावरून लोंबकळणारी दगडी कड्याकड्यांची साखळी. एका पाषाणातून कोरून काढलेल्या या साखळीला कुठंही जोड दिसत नाही. हे कसब निव्वळ अप्रतिम.

कांचीपुरमला गेलात तर हे मंदिर आवर्जून बघा. कांचीपुरमचं हे श्रीविष्णूंना समर्पित वरदराज पेरुमलमंदिर, शिवांना समर्पित एकाम्रेश्वरमंदिर आणि देवी पार्वतीचं कामाक्षी अम्मनमंदिर या तिन्ही मंदिरांना मिळून ‘मूनमूर्तिवासम’ असं नाव आहे, म्हणजेच ‘त्रिमूर्तिवास’. पुढच्या दोन लेखांमध्ये आपण या दोन्ही मंदिरांची ओळखही करून घेऊ.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here