औरंगाबाद: दिल्लीहून औरंगाबादमार्गे मुंबईकडे रवाना होणाऱ्या एअर इंडियाच्या विमानास बुधवारी (ता.२) खराब हवामानामुळे औरंगाबाद विमानतळावर उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हे विमान थेट मुंबईला पाठविण्यात आले. आठ वाजता मुंबईकडे उड्डाण करणारे विमान मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रवाशांना घेऊन मुंबईकडे झेपावले. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्यासह ७१ प्रवाशांना साडेपाच तास ताटकळत बसावे लागले.
एअर इंडियाच्या दिल्ली-औरंगाबाद-मुंबईदरम्यान नियमित उड्डाण करणारे विमान दिल्लीहून औरंगाबाद विमानतळावर रात्री साडेसात वाजता दाखल होते. रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ते मुंबईकडे उड्डाण करते. बुधवारी दिल्लीहून आलेले विमान खराब हवामान असल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळावर उतरण्यास परवानगी मिळाली नाही. यामुळे विमानाने चार ते पाच घिरट्या मारल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान याच विमानाने मुंबईला जाण्यासाठी ७२ प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही समावेश होता. विमानाचे टेक ऑफ ८ वाजून २० मिनिटांनी असल्याने प्रवाशी आणि राज्यमंत्री दानवे सात वाजताच विमानतळावर दाखल झाले होते.

Also Read: ‘मेटेंच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांकडून रसद’
विमान औरंगाबादेत त्यांच्या निर्धारित वेळेत दाखल झाले. मात्र परवानगी मिळाली नाही. प्रवाशी विमान परत येईल म्हणून थांबून होते. राज्यमंत्री दानवेही विमानतळावर रात्री दहापर्यंत थांबून होते. नंतर ते त्यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी परतले. रात्री साडेबारा वाजता मुंबईहून विमान परतले. त्यानंतर राज्यमंत्री दानवे हे विमानतळावर दाखल झाले. रात्री १ वाजून २० मिनिटांनी हे विमान मुंबईकडे टेकऑफ झाले.
Esakal