नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल बदलणार असून पात्र ठरलेले अनेकजण अपात्र होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने सोमवारी (ता. 7) त्यासंदर्भात बैठक बोलावली आहे.

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) राज्य सरकारने रखडलेल्या प्रक्रियांबद्दल मार्गदर्शन दिल्यानंतर आयोगाने त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. ‘एसईबीसी’तील उमेदवारांना खुल्या व ‘ईडब्ल्यूएस’मधून संधी मिळणार आहे. त्यामुळे जवळपास दीड लाख उमेदवारांच्या निकालांची पडताळणी करावी लागणार आहे. नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल (Result of MPSC exams) बदलणार असून पात्र ठरलेले अनेकजण अपात्र होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने सोमवारी (ता. 7) त्यासंदर्भात बैठक बोलावली आहे. (The result of MPSC exams is going to change)

सर्वोच्च न्यायालयातून ‘एसईबीसी’चे आरक्षण रद्द झाल्यानंतर ‘एमपीएससी’च्या 24 प्रकारच्या परीक्षांचे निकाल, मुलाखती, नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यावर आयोगाने सरकारकडून मार्गदर्शन मागविले होते. राज्य सरकारने त्यासंदर्भात आयोगाला मार्गदर्शन केले असून सरकारच्या पत्रानुसार आता कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना खुल्या आणि ईडब्ल्यूएसमधून संधी दिली जाणार असल्याने आतापर्यंत पार पडलेल्या प्रत्येक परीक्षांचा निकाल आता पुन्हा नव्याने जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांची पूर्व, मुख्य परीक्षा झाली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले, त्यातील काहींना बाहेर जावे लागणार असून त्याठिकाणी नव्यांना संधी मिळणार आहे. तर ज्या परीक्षांच्या मुलाखती राहिल्या आहेत, त्या परीक्षेची यादी मुख्य परीक्षेवरून पुन्हा नव्याने काढली जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या मुलाखती झाल्या आहेत, त्यापैकी काहीजण अपात्र ठरतील, असेही आयोगातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
Also Read: अरेरे! ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) कारभार फक्त एवढ्याच व्यक्तींवर
अशी होणार प्रक्रिया…
– ‘एसईबीसी’तील उमेदवारांची वयोमर्यादा अन् परीक्षा शुल्काची रक्कम पूर्वीप्रमाणेच राहणार कायम
– राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेला पात्र ठरविण्यापूर्वी पूर्व परीक्षेचा बदलणार निकाल
– मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींपूर्वी पुन्हा नव्याने तयार होणार निवड यादी
– वनसेवेसह अन्य पदांसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर; सरकारच्या निर्देशानुसार त्यातही होणार बदल
– पूर्व, मुख्य अन् मुलाखतीतही उत्तीर्ण झालेल्यांचा जाहीर झाला निकाल; राज्य सरकारच्या माध्यमातून होणार नियुक्त्या
Also Read: अभियांत्रिकी सेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
संयुक्त पूर्व परीक्षेपूर्वी उमेदवारांसाठी पर्याय
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे आरक्षण रद्द झाल्यानंतर त्या उमेदवारांना कशाप्रकारे पुढे संधी देता येईल, यासंबंधी राज्य सरकारने आयोगाला मार्गदर्शन पाठविले आहे. संयुक्त पूर्व परीक्षेपूर्वी आता ‘एसईबीसी’तील उमेदवारांना ईडब्ल्यूएस की खुल्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची आहे, त्यासंबंधी पर्याय भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना आठ ते दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या परवानगीने त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यातच ही परीक्षा होईल, असेही आयोगातील सूत्रांनी सांगितले. (The result of MPSC exams is going to change)
Esakal