कोरोना महामारीची राज्यातील दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत राज्यातील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात बुधवारी (ता.९) दिवसभरात १०,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८ लाख ६३ हजार ८८० झाली आहे. बुधवारी दिवसभरात १६ हजार ३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील मृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. मागील 24 तासांत राज्यात 261 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 19 शहरांत आणि महानगरपालिकांमध्ये बुधवारी एकाही मृत्यूची नोंद नाही.
राज्यातील प्रत्येक शहरांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं दिसत आहे. नांदेड शहरात सर्वाधिक कमी रुग्ण आढळले आहेत. बुधवारी नांदेडमध्ये फक्त दोन नवीन रुग्णाची भर पडली आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 14 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यातील 19 शहरांत एकाही मृताची नोंद झाली आहे. राज्यासाठी ही पॉझिटिव्ह बातमी आहे.
Also Read: मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार 28 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापूर शहरात 306 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर साताऱ्यामध्ये 835 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सांगलीमध्ये 785 नवीन रुग्ण आढळले आहेत. पुणे ग्रामिणमध्ये 734 आणि पुणे शहरांत 362 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीमध्ये 704 रुग्ण आढळले आहेत.
Also Read: HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट
या ठिकाणी एकही मृत्यू नाही –
गडचिरोली, चंद्रपूर शहर, गोंदिया, भंडारा, वाशिम, नांदेड, नांदेड शहर, उस्मनाबाद, परभणी शहर, हिंगोली, औरंगाबाद, सोलापूर शहर, पिंपरी चिंचवड, धुळे, धुळे शहर , मालेगाव शहर, भिवंडी, ठाणे शहर


कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५५ लाख ९७ हजार ३०४ आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ९५.४५ टक्के झाले आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, येथे ३१ मृत्यू नोंदवण्यात आले. मृतांचा एकूण आकडा १ लाख १ हजार ८३३ इतका आहे. राज्याचा मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ६१ हजार ८६४ सक्रिय रुग्ण आहेत.
Esakal