नवी दिल्ली : अमेरिकेने अल्झायमर (Alzheimer’s) या प्राणघातक आजारावरील बायोजेन इंक्स या कंपनीच्या ”आडूकानूमॅब” (Aducanumab) या औषधाला नुकतीच मंजुरी दिली आहे. सध्या इंग्लंडमध्ये या औषधाचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. अमेरिकेत या औषधावरुन वाद सुरू आहे. दुसरीकडे भारतात देखील अल्झायमरचे रुग्ण (Alzheimer’s patient in India) आहेत. त्यामुळे भारतात या औषधाला कधी मंजुरी मिळेल? असा प्रश्न उपस्थित होतोय. (when will the new drug approved by the america for alzheimers arrive in india)

औषध नेमके काय?

अल्झायमरच्या पहिल्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णाच्या मेंदूमध्ये अॅम्लॉइड बिटा हे चिकट द्रव असते. त्यामुळे स्मृतीभ्रंश होतो. तसेच रुग्ण स्वतः काय करतो याचं भान देखील त्याला नसतं. हेच द्रव बाहेर काढण्यासाठी आडूकानमॅब हे औषध काम करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र, या औषधामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होइल, असे नाही. पण रुग्णामध्ये वाढणारी आजाराची तीव्रता हे औषध नक्कीच कमी करू शकतं, असे परदेशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेमध्ये होणाऱ्या मृत्यूमागे अल्झायमर हे सहावे महत्वाचे कारण आहे. जगातील एकूण रुग्णांपैकी अमेरिकेमध्ये अल्झायमरचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या औषधाला फास्ट ट्रॅक बेसिसवर मंजुरी दिली आहे. पण, या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल अजून पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे हे औषध काम करणार की नाही, याबाबतही तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र, काही न्युरॉलॉजीस्टने या औषधाचं स्वागत देखील केलं आहे.

अमेरिकेने अल्झायमरवरील या औषधाला मंजुरी दिली आहे.

भारतात अल्झायमरवरील औषधाला मंजुरी द्यावी का?

अल्झायमवरील औषधाला भारतानं मंजुरी द्यावी का याबाबत बोलताना वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष आणि न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम सांगतात, ”अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन विभाग हे कुठल्याही औषधांना सहजासहजी मंजुरी देत नाही. त्यांच्या गाइडलाइन्स फार कठोर आहेत. मात्र, त्यांनी आडूकानूमॅब या अल्झायमरवरील औषधाच्या सुरुवातीच्या ट्रायलचा परिणाम पाहून जलद गतीने या औषधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे औषध नक्कीच रुग्णांवर सकारात्मक परिणाम करेल. त्यामुळे भारत सरकारने देखील या औषधाला मंजुरी द्यायला हरकत नाही.”

याबाबत बोलताना न्युरोलॉजिस्ट डॉ. निखिल पांडे म्हणतात, की ”या औषधाला भारत सरकारने मंजुरी द्यायला काहीही हरकत नाही.”

डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष आणि न्युरोलॉजिस्ट

Also Read: तुमच्या घरातील वृद्धही चालतांना अचानक पडतात?

भारतात औषध कधी येणार?

भारतात सध्या हजारामध्ये ४ इतके अल्झायमरचे रुग्ण आहेत. तसेच दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये भर पडत आहे. २०२० म्हणजे जवळपास ९ वर्षानंतर या रुग्णांचे प्रमाण दुप्पट होइल. मग, अशावेळी हे औषध भारतात कधी येणार? असा प्रश्न पडलाच असेल.

तर, याबाबत डॉ. मेश्राम सांगतात, ”भारतातील काही कंपनी केंद्र सरकारला औषध उत्पादन करण्यासाठी किंवा आयात करण्यासाठी परवानगी मागतील. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर औषधाच्या उत्पादनाला सुरुवात होईल. भारतात या औषधाचं उत्पादन घेणं जास्त सोयीस्कर ठरेल. कारण औषधांची आयात खूप महाग असते. आधीच आडूकानूमॅब या औषधाची किंमत जास्त आहे आणि अमेरिकेतून भारतात आयात करायचे झाल्यास त्याची किंमत दहापटीने वाढते. महाग औषध आपल्या भारतीय लोकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे भारतात उत्पादन झाल्यास त्याचा रुग्णांना फायदा होइल.”

याबाबत बोलताना न्युरॉलॉजीस्ट डॉ. निखिल पांडे म्हणातात, ”बायोजेन कंपनीने भारतातील कंपनीसोबत टायअप करून हे औषध तयार करणं गरजेचं आहे. कारण बायोजेनच्या भारतात शाखा नाहीत. मात्र, त्याला केंद्र सरकारनं मंजुरी देणं गरजेचं आहे. पण, भारतीय लोकांवर म्हणजे अल्झायमरच्या रुग्णांवर चाचण्या केल्या तर त्या जास्त सोयीस्कर ठरतील. भारतीय रुग्णांवर हे औषध कसा परिणाम करतात? ते आपल्याला समजू शकेल.”

जगात अल्झायमरचे पाच कोटी रुग्ण

जगामध्ये अल्झायमरचे पाच कोटी रुग्ण आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण अमेरिकेचे आहे. त्यानंतर युनायटेड किंग्डमचा क्रमांक लागतो. त्यामुळे या देशांना अल्झायमरवरील औषधांची गरज आहे. मात्र, पुढील काळात भारताला देखील या औषधांची जास्त गरज भासणार आहे. कारण, भारतात सध्या तरुण लोकसंख्या आहे. मात्र, जसं-जसं वय वाढत जातं तसे अल्झायमरचे रुग्ण देखील वाढतात. आधी हीच रुग्णसंख्या कमी होती. मात्र, आता हजारात चार लोकांना अल्झायमर होत आहे. येत्या २०३० पर्यंत भारतात अल्झायमरचे रुग्ण दुप्पट होण्याची भीती आहे.

Also Read: टॉयलेटमध्ये मोबाईल नेताय? गुप्तांगाला होऊ शकतो ‘हा’ त्रास

अल्झायमर म्‍हणजे काय?

अल्झायमर आजारात विस्‍मृती वाढत जाते. पहिले नाव विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. अल्झायमरची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. या आजारामध्ये सुरुवातीला मेंदूमध्ये ‘अ‌ॅम्लॉइड बीटा’ हे द्रव असतं. त्यामुळे कार्यकुशलता कमी होते.

अल्झायमर असे नाव का पडले?

अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली या आजाराचा शोध लावला. त्यामुळे यास अल्झायमर आजार असे नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि गुठळ्या अशा अवस्थेतील एका मृत स्त्रीचा मेंदूचा अभ्यास त्यांनी केला होता. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यू झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो.

अल्झायमर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?

  • आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे.

  • तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे.

  • मधुमेह आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे

  • मेंदूला नेहमी सक्रीय ठेवणे

  • वेगवेगळे छंद जोपासणे.

  • नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे.

  • निवृत्तीनंतर काहीही न करणे हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे सतत काही ना काही करून मेंदूला सक्रीय ठेवणे गरजेचे आहे.

  • सामाजिक कार्यात भागात भाग घेणे.

  • जीवनसत्व बी १२ यामुळे देखील अल्झायमर सारखे लक्षणं दिसतात. तसेच शाकाहारी जेवणामधून जीवनसत्व बी १२ मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांनी औषधांचं सप्लिमेंट घेणं गरजेचं असतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here