रेवदंडाजवळील समुद्रात तटरक्षक दलाची थरारक कामगिरी
रेवदंडा: रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (Revdanda) जवळील खवळलेल्या समुद्रात (Ocean) बुडत असलेल्या जहाजातील (Ship) 16 खलाशांना (Sailors) वाचविण्याची थरारक कामगिरी तटरक्षक दलाने (Coast Guard) गुरूवारी सकाळी केली. तटरक्षक दलाची गस्तीनौका सुभद्राकुमारीचौहान वरील सैनिक तसेच दमणच्या तळावरून आलेले हेलिकॉप्टरवरील (Helicopter) सैनिक यांनी धाडसाने ही मोहीम यशस्वी (Rescue Operation) केली. विशेष म्हणजे एमव्ही मंगलम या बुडत्या जहाजावरील कप्तान (Ship Captain) व कर्मचारी (Workers) जहाज सोडण्याच्या बेतात होते. मात्र खवळलेल्या समुद्रात त्यांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धीर देत जहाजावरच राहण्यास सांगितले व त्यांची यशस्वी सुटका केली. (Coast Guard thrilling rescue operation at sea near Revdanda saves 16 lives see video)
Also Read: प्रदीप शर्माकडेही सापडली सचिन वाझेसारखीच रिव्हॉल्वर
पावसाळी वातावरणामुळे आज सकाळपासूनच समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या तर तुफानी पावसामुळे दृष्यमानताही कमी झाली होती. त्यातच आज सकाळी तटरक्षक दलाच्या मुंबई विभागास मंगलम या भारतीय जहाजाकडून मदतीची विनवणी आली. रेवदंडा बंदरापासून समुद्रात तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे जहाज बुडण्याच्या मार्गावर होते. त्यावरील खलाशीही घाबरलेले असल्याने जहाजाचा कप्तानही जहाज सोडण्याच्या बेतात होता. त्यावेळी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना धीर दिला व बचाव पथक मदतीला येत असल्याने जहाजावरच राहण्यास सांगितले.

Also Read: राज्यात दर दिवशी एका तासाला सरासरी 21 लोकांचा मृत्यू
जवळील दिघी बंदरातून तटरक्षक दलाचे सुभद्रा कुमारी चौहान हे जहाज मदतीला निघाले तर दमणच्या तटरक्षक दलाच्या तळावरूनही दोन हेलिकॉप्टरनी रायगडच्या दिशेने उड्डाण केले. सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सुभद्रा कुमारी चौहान जहाज समुद्रात मंगलम या बुडत्या जहाजाच्या जवळ आले व परिस्थिती पाहून त्यांनी छोट्या नौका मदतीसाठी पाठवल्या. तोपर्यंत हेलिकॉप्टरच्या साह्याने मंगलम जहाजावरील खलाशांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. थोड्याच वेळात बुडत्या जहाजावरील सर्व 16 खलाशांची सुटका करून त्यांना रेवदंडा येथे नेण्यात आले.
Esakal