पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा आढावा पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या हिश्श्याचा १२०० कोटी रुपयांचा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. (Prime Minister Narendra Modi will review the metro project)
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर (बीओटी) पीएमआरडीएने हाती घेतले आहे. हे काम निविदा मागवून टाटा-सिमेन्स या कंपनीला दिले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पास आवश्यक असलेल्या सर्व प्रकाराच्या मंजुरी राज्य सरकारने दिल्या आहेत.
Also Read: देहूत संचारबंदी : रस्त्यांवर शुकशुकाट, पाहा फोटो

हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारणार असला, तरी त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी २० टक्के, तर टाटा कंपनी ६० टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे ‘व्हायबल गॅप फंडींग’च्या स्वरूपात केंद्राकडून १२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव पीएमआरडीएने चार महिन्यांपूर्वीच केंद्राकडे पाठविला आहे. मध्यंतरी केंद्राने प्रस्तावात काही त्रुटी काढल्या होत्या. त्यात सुधारणा करून पीएमआरडीएने पुन्हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविला आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
दरम्यान, पुढील महिन्यात देशातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत. त्यामध्ये पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाचाही समावेश आहे. या बैठकीत केंद्राकडील २० टक्के हिश्श्याची रक्कम देण्याबाबतच्या प्रस्तावावरही चर्चा होऊन तो मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मेट्रोचे काम मार्गी लागण्याच्या कामातील मोठा अडथळा दूर होणार आहे.
Also Read: दहावीनंतर पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू
”पुढील महिन्यात देशातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामध्ये पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नगर विकास खात्याने या प्रकल्पासंदर्भातील सर्व माहिती मागविली आहे. संपूर्ण माहिती पीएमआरडीएकडून पाठविली आहे.”
– सुहास दिवसे,आयुक्त, पीएमआरडीए
Esakal