भाजपच्या अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर ‘हल्लाबोल’
मुंबई: राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. त्याच दृष्टीने राज्यातील कोरोनाचा धोका कमी झाला असूनही लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. एकीकडे राज्याचे आणि पक्षाचे प्रमुख कोरोना रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच स्थानिक स्तरावर शिवसैनिकांकडून या प्रयत्नांना सुरूंग लावला गेल्याचं चित्र दिसलं. नागपुरात शिवसेना आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात झालेल्या हल्लाबोल आंदोलनात कोरोना नियम चक्क धाब्यावर बसवले गेले आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते मास्कविना महापालिकेत पोहोचले. याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. (BJP Leader Atul Bhatkhalkar slams Shivsena because of restrictions on Hindu Festivals term it as Janabsena)
Also Read: ‘छोट्या खात्याचा मंत्री’ म्हणणाऱ्या राऊतांना राणेंचं उत्तर
नागपुरात घडलेल्या या प्रकाराबद्दल भाजपच्या अतुल भातखळकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विविध सण-उत्सवांसाठी नियमांची यादी दिली जाते. पण स्वत:च्या पक्षातील मंडळींकडून नियमभंग होत असल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, अशी कानउघाडणी त्यांनी केली. तसेच, हिंदु सणांबद्दल ठाकरे सरकारच्या मनात आकस भाव असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘नागपुरात शिवसैनिकांनी हल्लाबोल आंदोलनात कोरोना नियम धाब्यावर बसवले. गणेशोत्सव, आषाढी एकादशीची वारी अशा सगळ्या हिंदू सणांना अटी आणि शिवसेनेच्या पक्षीय कार्यक्रमांना सूट. जनाबसेना म्हणजे फक्त ढोंग, ढोंग आणि फक्त ढोंग’, असं ट्वीट करत त्यांनी शिवसेनेवरच हल्लाबोल केला.

Also Read: मोदींच्या मंत्रिमंडळातील मूळ चेहरा शिवसेना, राष्ट्रवादीचाच!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक उत्सवांवर निर्बंध लादले. राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांनी कोरोनासंदर्भातल्या नियमांचे पालन करावे, असा ठाकरे यांचा आग्रह आहे. पण नागपुरात शिवसेना आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कोरोना नियमांचा फज्जा उडाला. नागपूरच्या अजनी भागात उभारल्या जाणाऱ्या इंटर मॉडेल स्टेशन म्हणजेच, आयएमएस प्रकल्पासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार आहे. महापालिकेने त्यासंदर्भात 4 हजार 500 वृक्ष तोडण्यासाठी निविदा काढली असून नागपूरच्या अनेक पर्यावरण संघटन या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्याच वादात उडी घेत शिवसेनेने आज नागपूर महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढला होता.
Esakal