नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष वाढला आहे. चंद्रपूर, यवतमाळ यासारख्या जंगल असलेल्या भागात जवळपास दररोज वाघाचा हल्ला (tiger attack) झाल्याच्या घटना घडतात. तो वाघ ‘मॅन इटर’ किंवा ‘मॅन किलर’ असल्याचे बोलले जाते. मात्र, खरंच वाघ हा ‘मॅन इटर’ असतो का? (man eater tiger) आणि वाघ नेमका हल्ला का करतो? याबाबतच आज आपण जाणून घेऊयात. (is tiger really man eater)
Also Read: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान
वाघ खरंच मॅन इटर असतो का? याबाबत सुनिल लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सांगतात, ” वाघाने किंवा कुठल्या वन्यप्राण्याने केलेला हल्ला हा एक अपघात असतो. कुठलाही वाघ भक्ष्य मिळवायचं म्हणून माणसाच्या मागे लागला असं अजिबात होत नाही. जोपर्यंत वाघ असेल किंवा कुठलाही प्राण्याची शारीरिक स्थिती चांगली असते तोपर्यंत तो मानवाच्या मागे लागणार नाही. वाघाचे नखं, दात नसतील तेव्हा त्याला हरिण किंवा जंगलातील इतर वन्यप्राण्यांची शिकार करता येत नाही. तसेच गुरं-ढोरं किंवा माणूस हा हरिणासारखा किंवा इतर वन्यप्राण्यासारखा वेगाने पळू शकत नाही. त्यामुळे वाघ गुरं-ढोरं किंवा गुराख्यावर हल्ला करतात. त्यामुळे लोक त्याला मॅन इटर म्हणतात. कुठलाही प्राणी हा अंगावर मुद्दाम धावून येणार नाही. वाघ दिसल्यास तो तुमच्याकडे पाहून गुरगुरेल. त्याला पळायची जागा असेल तर तो पळणारच. पळायला मार्ग नसेल तर तो हल्ला करणार. मॅन इटर या चुकीच्या संकल्पना आहेत. हे फक्त वापरले गेलेले शब्द आहेत.”

वाघ हल्ला कधी करतो?
गेल्या काही दिवसांपूर्वी पांढरकवडा येथे वाघाने तरुणावर हल्ला केला. त्यानंतरही वाघ हा मृतदेहाजवळच बसलेला होता. मग त्याठिकाणी असं का घडलं असावं? कारण वाघ हा माणसाला घाबरलेला नव्हता. त्या वाघाने एकाला मारल्यानंतरही तो मृतदेहाजवळ बसून होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन गोरेवाड्यात सोडण्यात आले. त्याची तपासणी केली. त्यावेळी वाघ शारीरिकदृष्ट्या एकदम ठीक होता. तरीही वाघाने हा हल्ला का केला होता? असा प्रश्न होता. मात्र, त्याच्या अधिवासात माणसं-गुरंढोरं वावरताना दिसली. त्यामुळे वाघाने माणसांना घाबरणं सोडल होतं. त्यामधूनच हा हल्ला झाला असावा, असंही ते सांगतात. पांढरकवड्यातील त्या वाघाला आता तपासणी करून त्याच्या अधिवासात सोडणे गरजेचे आहे. त्याला दुसऱ्या जागी सोडले तर नक्कीच तो मानवी वस्तीकडे धाव घेईल. त्यामुळे तो लहानपणापासून वाढला त्याच ठिकाणी त्याला सोडणे गरजेचे आहे.
वाघाचे हल्ले कसे टाळायचे?
वाघापेक्षा लहान व्यक्ती असेल तेव्हा त्याला वाटतं की हा आपला भक्ष्य आहे. त्यामुळे वाघ हल्ला करतो. एखाद्यावेळी गुराख्याने काठी उचलून देखील वाघाने त्याच्यावर हल्ला केला, असं होत नाही. आपण बसून कुठलंही काम करतो. त्यावेळी प्राण्याला आपण त्याचा भक्ष्य वाटतो. अशावेळी दोन व्यक्तींना उभं ठेवून त्यांनी कुठं प्राणी आहे का? याकडे लक्ष ठेवावे. तसेच शेताच्या सभोवताल असणारे झुडपं जाळून टाकावी. त्यामुळे कुठं प्राणी असेल तर तो लगेच दिसेल. तसेच जंगलानजीकच्या भागात जगजागृती होणे गरजेचे आहे. वाघाला कुठल्या गोष्टी समजत नाही. त्यामुळे माणसाला समजून घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे आपण काळजी घेतली तर लगेच त्यामुळे ९० टक्के मृत्यू कमी होतील, असेही लिमये म्हणाले.
Esakal