पाली : जिल्ह्यातील अंबा नदीने (amba rivar) धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बुधवारी (ता.21) दुपारी साडेतीन वाजल्यानंतर पाली (pali), जांभुळपाडा (jambulpada) व खुरावले (khuravle)अंबा नदी पुलावरून पाणी जाऊ लागले होते. यामुळे वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक व भैरव खुरावले मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी प्रवाशी व वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. (Danger level crossed by Amba river Traffic closed)
मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोणत्याही नुकसानीची किंवा मृत्यूची घटना झालेली नाही. मात्र अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुका प्रशासनाने नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी आपली सुरक्षितता म्हणून मौल्यवान वस्तू व कागदपत्रे घेऊन सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत व काही अडचण असल्यास नागरिकांनी मला किंवा आपत्कालीन कंट्रोल रुमला संपर्क करा असे आवाहन तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी केले आहे. तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना देखील दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना सुधागड-पालीचे तहसीलदार दिलीप रायण्णावार म्हणाले, ‘पाली व जांभूळपाडा पुलावर पाणी आल्याने वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग रहदारी करिता बंद करण्यात आला आहे. तसेच खुरावले येथील अंबा नदी पुलावरून देखील पाणी गेल्याने खुरावले व भैरव आदी गावातील रस्ता रहदारी करिता बंद करण्यात आला आहे.’
Esakal