पुणे – राज्यात अतिवृष्टी (Rain) आणि त्यामुळे विविध नद्यांची पातळी (River Level) वाढल्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि अन्य जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. याच अनुषंगाने भारतीय लष्करातर्फे (Indian Army) पूरग्रस्तांच्या (Flood Affected) मदतीसाठी (Help) सातत्याने मदतकार्य सुरू आहे. यामध्ये दक्षिण मुख्यालयाने ऑपरेशन वर्षा २१ अंतर्गत पूरग्रस्त भागांमध्ये स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात केली आहेत. (Indian Army Launches Relief Work for Flood Victims)

या मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी पुण्यातील औंध लष्करी तळ व बॉम्बे इंजिनिअर ग्रुपचे १५ पथक सांगली, पलूस , बुर्ली आणि चिपळूणमध्ये मदत कार्यासाठी तैनात आहेत. पथकांद्वारे पूरग्रस्त भागातून १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लष्करातर्फे गावकऱ्यांना तयार खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी पुरवत आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिबिरे देखील स्थापन केली आहेत. यामध्ये पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी लष्करातील डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांची वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

तर लष्कराने दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे बुद्रूक गावातला मुख्य मार्ग खुला केला आहे. सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यातील दक्षिण मुख्यालयात ‘मदत सहाय्यता मोहीम वॉर रूम’ची स्थापना केली आहे. त्याचबरोबर आणखीन दहा पथके आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Esakal