महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Mahabaleshwar) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. येथील हिरडा विश्रामग्रहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, राजेश कुंभारदरे, डी. एम. बावळेकर आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी प्रांताधिकारी राजापूरकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यातील ११३ गावांपैकी ८५ गावांमध्ये नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. (Rain Update Minister Shambhuraj Desai Visited Mahabaleshwar Taluka bam92)
महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी रस्त्यांच्या नुकसानीची माहिती दिली. या वेळी सहायक वनसंरक्षक सचिन डोंबाळे, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीचे गिरीश दापकेकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, महावितरणच्या दीपाली बर्गे, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, सहदेव भिसे, लहू राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राज्यमंत्री देसाई म्हणाले,‘‘ जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, कऱ्हाडचा काही भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यात रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन अनेक विहिरी बुजल्या असून, पाण्याच्या प्रवाहाने दिशा बदलल्याने बांध वाहून गेले. अनेकांची जनावरे वाहून गेली. गावांना जोडणारे पूल तुटले, याची पाहणी व आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला असून, अतिवृष्टीमुळे बाधित झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, अशा सूचना दिल्या.’’ येरणे गावासारख्या काही गावांची पुनर्वसनाची मागणी आहे. अशा गावांची भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करून प्राधान्याने विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Also Read: ‘जनतेच्या पुनर्वसनासाठी जितेंद्र यादवांशी चर्चा करणार’

राज्यमंत्री देसाई यांनी महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यक्रमात मंत्री देसाई यांच्या वतीने अतिदुर्गम भागातील गरजू, गरीब लोकांना प्राथमिक स्वरूपात धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सोळशी नदीवर असलेला कुरोशी पूल अतिवृष्टीमुळे कोसळल्याने पलीकडच्या काही गावांचा संपर्कच तुटला आहे. या भागात तातडीने काय काय उपाययोजना करता येतील, याची अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी संतोष जाधव, संजय शेलार, शहरप्रमुख राजा गुजर, गोपाळ लालबेग, संजय ओंबळे, विशाल सपकाळ, लीलाताई शिंदे, राजश्री भिसे, वनिता जाधव, सचिन वागदरे, राजेश घाडगे, जितेश कुंभारदरे, सागर शिंदे आदी उपस्थित होते.
Rain Update Minister Shambhuraj Desai Visited Mahabaleshwar Taluka bam92
Esakal