सोलापूर: सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 95 टक्क्यांहून अधिक भरले आहे. पाण्याचा वापर काटकसरीने केले जाईल, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: उजनी धरण 90 टक्क्यांवर! धरणातून ‘कधी’ सोडले जाणार पाणी
उजनी धरणात पाणीसाठा वाढल्याने जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मोठी मदत झाली आहे. यंदाच्या गाळप हंगामात जवळपास 27 कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप घेतील, असा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाला धरणामुळे बळकटी आली आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न धरणाच्या माध्यमातून सुटण्यास मदत झाली. शनिवारी (ता. 2) रात्री दहा वाजेपर्यंत धरण 95. 49 टक्क्यांपर्यंत आले होते. दौण्ड व बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ग चांगला असल्याने काही दिवसांत धरण 100 टक्के भरेल, असा विश्वास साळे यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने धरण पुढील आठवड्यात शंभर टक्क्यांची पातळी ओलांडेल, असेही ते म्हणाले. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. यंदाचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या मान्यतेने ठरणार आहे.
हेही वाचा: आनदाची बातमी; चार दिवसात उजनी धरण येणार “प्लस’मध्ये

Ujani Dam
पुढच्या आठवड्यात धरण 100 टक्के भरेल. दौण्ड व बंडगार्डनमधून चांगला विसर्ग येत आहे. कालवा सल्लगार समितीच्या मान्यतेने पाण्याचे पुढील नियोजन ठरणार आहे. सर्वांनी काटकसरीने पाणी वापरावे.
– धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर
ठळक बाबी…
– दौण्डमधून चार हजार 905 तर बंडगार्डनमधून दोन हजार 915 क्युसेकचा विसर्ग
– पुढील आठवड्यात धरण 100 टक्के भरेल; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सर्वांना आवाहन
– 110 टक्क्यांपर्यंत धरण भरल्यानंतर नदीद्वारे सोडले जाणार पाणी
– जानेवारीत पहिले आवर्तन सोडले जाण्याची शक्यता; त्यावेळच्या परिस्थितीनुसार कालवा सल्लागार समिती घेणार निर्णय
Esakal