पाटणा : बिहारमधील (Bihar) सासाराम रेल्वे स्टेशन (Sasaram Railway Station) हे ज्ञान केंद्र बनलंय. ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय ना? पण, हे खरं आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसताहेत. त्यामुळं बिहारचं ‘कोचिंग सेंटर’ म्हणूनही आता त्याची ओळख बनलीय. दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन तास विद्यार्थी येथे अभ्यास करताना पाहायला मिळतील.
बिहारमधील सासाराम हे शहर रेल्वे जंक्शनसाठी प्रसिद्ध आहे. वास्तविक, घरांमध्ये विजेचा प्रवाह सतत कमी असतो, त्यामुळं लाईट जाण्याचं प्रमाण इथं सर्वाधिक आहे. म्हणून, लाईट गेल्यावर विद्यार्थी एक गट तयार करून या जंक्शनमध्ये पोहोचतात आणि तिथं स्टेशनच्या स्ट्रीट लाईटीखाली अभ्यास करतात. याबाबत रेल्वे प्रशासनाला कोणतीही अडचण नाही. स्टेशन प्रशासनानं सांगितलं, की विद्यार्थी स्टेशनच्या प्रकाशात अभ्यास करतात, त्यांना यावर कोणताही आक्षेप नाही. स्टेशन परिसरातील प्रवाशांनी सांगितलं, की हे त्यांच्यासाठी प्रेरणादायी असून त्यांना विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण येत नाही. उलट विद्यार्थी अभ्यास करताहेत यातच सगळं आलं, असं ते सांगतात.
हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

कोचिंग हब
विद्यार्थ्यांनी सांगितलं, की जेव्हा ते अभ्यास करतात, तेव्हा प्रवासी देखील त्यांना आधार देतात आणि शांत राहतात, ज्यामुळे ते त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतात. स्ट्रीट लाईटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते, बहुतेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करताहेत. यातील अनेक विद्यार्थी यशस्वीही झाले आहेत. येथे पोहोचणारे विद्यार्थी रेल्वे, एसएससी आणि इतर परीक्षांची तयारी करतात. संध्याकाळीच्या वेळी विद्यार्थी सासाराम स्थानकावर गटचर्चाही करताना दिसतील.
‘कोचिंग सेंटर’ची सुरुवात कशी झाली?
विद्यार्थ्यांच्या मते, त्यांच्या गावांमध्ये आणि घरात सायंकाळपासून रात्रीपर्यंत वीजच उपलब्ध नसते, त्यामुळं अभ्यास करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत ग्रामपंचायतीला देखील तक्रार दिली होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि आताही तशीच स्थिती आहे. 2002-2003 पासून विद्यार्थ्यांचा एक छोटासा गट अभ्यासासाठी स्टेशनवर येऊ लागल्यानंतर, या जंक्शनला ‘कोचिंग सेंटर’ अशी ओळख मिळालीय. सुरुवातीच्या काळात चार-पाच विद्यार्थी या रेल्वे स्टेशनवर अभ्यासासाठी येत होते. नंतर हळूहळू विद्यार्थ्यांची ही संख्या वाढू लागली आणि मग एक गट तयार झाला. माहितीनुसार, जवळच्या अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी येथे सासाराम नगरमध्ये राहतात आणि नंतर सायंकाळी स्टेशनवर पोहोचतात. यातील अनेक विद्यार्थ्यांकडे कोचिंग क्लासेसमध्ये सामील होण्यासाठी पैसे नाहीत. अशा स्थितीत काही विद्यार्थी कोचिंगमधून नोट्स आणतात आणि मग, ते स्टेशनात एका ग्रुपमध्ये बसून एकत्र परीक्षेची तयारी करतात. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी आयएएस अवनीश शरण (IAS Awanish Sharan) यांनी या उपक्रमाचं ट्विटरवरुन कौतुक केलंय.

Sasaram Railway Station
हेही वाचा: NDA, NA मध्ये फक्त 400 जागा; महिला उमेदवारांची संख्या वाढणार?
Esakal