शिरपूर : सावळदे (ता.शिरपूर) येथील पुलावरुन तापी नदीत (Tapi River) शनिवारी सकाळी प्रेमी युगुलाने (Loving couple) उडी टाकली. पट्टीच्या पोहणार्‍यांनी युवतीला तातडीने बाहेर काढल्याने ती बचावली. तीन तासानंतर युवकाचा मृतदेह (Drowning) हाती लागला. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर सोबत राहणे शक्य होणार नसल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी आढळले.

हेही वाचा: गावविकासासाठी ग्रामस्थ दसऱ्याला येतात एकत्र;४०वर्षापासून परंपरा

अमोल किशोर कोतकर (वय 31, रा.वारूळ-पाष्टे ता.शिंदखेडा) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे शिरपूर फाट्यावर आशापुरी स्पेअर पार्टस् हे दुकान आहे. त्याचे दर्शना येवले (रा.नाशिक) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दर्शनाचे माहेर मालेगाव (जि.नाशिक) येथील असून सासर नाशिक येथील आहे. दोघेही नातलग असून काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. प्रेम फुलत गेल्याने त्याची कुणकूण दर्शनाच्या सासरच्या लोकांना लागली. त्यांनी चौकशी करुन अमोल कोतकरशी तिचे संबंध असल्याचे हुडकून काढले. 15 ऑक्टोबरला तिला घेवून सासरचे कुटूंब धुळे येथे पोहचले. अमोल कोतकरलाही बोलावण्यात आले. तुमचे प्रेमसंबंध असतील तर घटस्फोट देऊन अमोलसोबत जा असे सासरच्या लोकांनी दर्शनाला सांगितले. मात्र तिच्या आईने घटस्फोटाला नकार दिला. अखेर दोन्ही बाजूंचे लोक नरडाणा येथे गेले. तेथे अमोलच्या कुटुंबाशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दर्शनाला घेऊन अमोल शिरपूरला निघून गेला.

हेही वाचा: दुर्गम गावामध्ये अनोखा उपक्रम..मासिकपाळी बद्दल जनजागृती

शनिवारी सकाळी अमोल व दर्शना आत्महत्या करण्याच्या हेतूने सावळदे येथे पोहचले. तेथील पुलावर पोहचल्यावर त्यांनी बाहेरगावी जाऊन एकत्र राहू असा विचार केला. तेथून दोघेही परत शिरपूरला आले. मात्र दोघेही विवाहित असल्यामुळे पुढील आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतील, त्यापेक्षा मरण बरे अशा विचाराने ते पुन्हा सावळदे येथे पोहचले. सकाळी नऊला दोघांनी हातात हात घेऊन पुलावरुन उडी टाकली. त्याचवेळी नदीपात्रात सावळदे येथील पट्टीचे पोहणारे 15 ऑक्टोबरला बुडालेल्या युवकाचा शोध घेत होते. त्यांच्यापासून काही अंतरावरच दोघे पाण्यात पडले. लागलीच धाव घेवून दर्शनाला जिवंत बाहेर काढण्यात संबंधितांना यश आले. मात्र अमोल उडी टाकल्यानंतर थेट तळाशी गेल्याने त्याचा शोध लागू शकला नाही. तीन तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. डीवायएसपी अनिल माने, निरीक्षक रवींद्र देशमुख, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. सावळदे येथील सरपंच सचिन राजपूत यांनी मदतकार्य केले.

दर्शनाने दिली माहिती..

प्रारंभी या प्रकाराबाबत काहीच उलगडा होत नव्हता. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दर्शना येवले हिनेच अमोलबाबत माहिती दिली. आत्महत्येचे कारणही सांगितले. सोबत जगू शकलो नाहीत म्हणून सोबत मरण पत्करले होते, पण तिथेही नियतीने आमची ताटातूटच केली म्हणतांना तिला रडू कोसळले. अमोल कोतकरचा 26 ऑगस्टला विवाह झाला होता. लग्नानंतर त्याच्या व दर्शनाच्या प्रेमकथेला सुरवात झाली. तिच्या माहेरी संपर्क साधून घडल्या प्रकाराबाबत सूचित करण्यात आले. मात्र उशिरापर्यंत कोणीही पोहचले नव्हते. शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा: चाळीसगाव; तरवाडे येथे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

पूल ठरतोय सुसाइड पॉइंट

धुळे-पळासनेर टोलवे कंपनीने बांधलेल्या या पुलावरुन आत्महत्येच्या घटना नियमित घडतात. अलिकडे सामूहिक आत्महत्येचे प्रकारही वाढले आहेत. वैफल्यग्रस्त प्रेमीयुगलांचा तर हा आवडता सुसाइड पॉइंट ठरला आहे. पुलाच्या निर्मितीपासून त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक लोखंडी जाळी बसवावी अशी मागणी केली जात आहे. त्यास कंपनीने होकारही दिला. प्रत्यक्षात आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल केलेली नाही. त्यामुळे सावळदे परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here