मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (aryan khan drugs case) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer sameer wankhede) यांचे पाय खोलात गेल्याचे दिसतेय. मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) अधिक आक्रमक झाले असून ते वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. कालच त्यांनी ट्विटरवरून वानखेडेंच्या जन्माचा दाखला शेअर केला होता. आता एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र (NCB letter to nawab malik) पाठवलं असून ते मलिकांनी ट्विट केलंय. त्यामध्ये अनेक नवनवीन खुलासे करण्यात आले आहेत. समीर वानखेडेंची नियुक्ती कशी झाली? याबाबत गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा: ”माझे वडील हिंदू, तर आई…” मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा
एनसीबीच्या अज्ञात कर्मचाऱ्याने लिहिलेल्या पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्या नियुक्तीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. ”सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्सची चौकशी एनसीबीकडे सोपविण्यात आली होती. त्यासाठी माजी अधिकारी राकेश अस्थाना यांनी एक एसआयटी स्थापन करून कमलप्रितसिंह मल्होत्रा यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांना सांगून महसूल विभागात काम करणारे समीर वानखेडे यांची अवैधपणे एनसीबीच्या झोनल डायरेक्टरपदी नियुक्ती केली. त्यांना राकेश अस्थाना यांनी साम-दाम-दंड भेदाचा वापर करून बॉलीवूडच्या कलाकारांना अडकविण्याचे आदेश दिले. त्यासाठी बॉलीवूड कलाकारांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून समीर वानखेडे आणि मल्होत्रा यांनी बॉलीवूड कलाकारांना करोडो रुपयांची मागणी केली. त्यापैकी काही हिस्सा हा राकेश अस्थाना यांना देखील जात होता. हे सर्व पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करून दिला”, असे गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहे.

NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना लिहिलेले पत्र
पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय –
एनसीबीतील एका अधिकाऱ्याने मला पत्र पाठवलं असून दोन दिवसाआधी मला ते मिळालंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र दिलं असून यामध्ये २६ प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. बॉलीवूड कलाकारांकडून कशी वसुली केली जाते आणि कशी चुकीची कामे केली जातात याचा उल्लेख या पत्रात आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
Esakal