पुणे – जम्मू काश्मीरच्या भागात दहशतवादी हल्ल्यांचा सामना करत असतानाच भारतीय सैन्यदलाच्या वतीने येथील काही दुर्गम भागांच्या विकास कामांवरही भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल खोऱ्यातील स्थानीकांना सौरऊर्जेवरील दिवे उपलब्ध करून देण्यात आले आहे. काश्मीर येथील संघर्ष कमी करण्याच्या तसेच दुर्गम भागातील स्थानीकांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी सैन्यदलाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.

भौगोलिक परिस्थितीमुळे मच्छल हे गाव विकासकामांपासून वंचित राहिले आहे. हिवाळ्यात या खोऱ्यातील स्थानींकाना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी सैन्यदलाच्या वतीने स्थानिक लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. सैन्यदलाने मच्छल गावात रुग्णालये, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच येथे सर्वाधिक मोठी समस्या ही वीज पुरवठ्याची असून कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम उपकरणांचा वापर वाढल्याने हिवाळ्यात विजेची मागणी देखील वाढते. ही समस्या दूर करण्यासाठी सैन्यदलाने आतापर्यंत ५०० हून अधिक सौर ऊर्जेवरील दिवे स्थानिकांना प्रदान केले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांचा विकास व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने भारतीय सैन्यदल अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवीत आहेत. अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
हेही वाचा: पुणे : निम्मी भाडेमाफी; आता कारवाई
लष्कराद्वारे काश्मीर खोऱ्यात करण्यात येत असलेल्या शांतता प्रयत्नांमुळे काश्मीर संघर्षावर तोडगा काढण्याच्या शक्यतांबद्दल आशावाद प्राप्त होत आहे. अशा विविध उपक्रमासारख्या अनेक ठोस घडामोडींमुळे नक्कीच काश्मीरच्या संघर्षाला कमी करण्यासाठी आत्मविश्वास वाढत आहे. सध्या काश्मीरमध्ये सुरक्षा टिकवण्यासाठी दैनंदिन कारवाया व्यतिरिक्त, सैन्यदल सातत्याने स्थानिकांना मदत करण्यासाठी पोहचत असल्याचे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
Esakal