
5 तासांपूर्वी
काठमांडू: नेपाळने (Nepal) पुन्हा एकदा सीमावादाचा (Border row) मुद्दा उकरुन काढला आहे. भारताच्या हद्दीत असलेल्या तीन गावांवर नेपाळने दावा सांगितला आहे. उत्तराखंडच्या कालापानी भागामध्ये (Kalapani area) ही तीन गाव वसलेली आहेत. नेपाळने सर्वप्रथम मागच्यावर्षी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला होता. नवीन नकाशा (New map) प्रकाशित करुन लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारताच्या हद्दीतील प्रदेश नेपाळने आपला भूभाग असल्याचे दाखवले होते.
नेपाळने त्यांच्या देशात सुरु असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उपस्थित केला आहे. “ती तीन गाव नेपाळचा भाग आहेत. पण तिथे भारतीय सैन्य दलाची उपस्थिती आहे. यावर सरकारी स्तरावर योग्य तोडगा निघाला, तरच आमची पथक तिथे जनगणनेसाठी जाऊ शकतात” असं नेबीन लाल श्रेष्ठ म्हणाले. त्यांच्यावर या जनगणनेची जबाबदारी आहे.
हेही वाचा: आजचे राशिभविष्य आणि पंचांग – 18 नोव्हेंबर 2021
“नेपाळचा या गावांवर काही हक्क नाही. ती भारतात असलेली गाव आहेत. त्यामुळे जनगणनेसाठी तिथे नेपाळी यंत्रणेला जाण्याची परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” असे सशस्त्र सीमा बलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. “ही गावं भारताच्या हद्दीत येतात. तिथले रहिवाशी भारतीय नागरिक आहेत. नेपाळी यंत्रणा आमच्या भागात जनगणना कशी करु शकते?” असा सवाल या अधिकाऱ्याने विचारला.
हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी
मागच्यावर्षी भारताने धारचुला ते लिपूलेख पर्यंत जाणारा मार्ग खुला केल्यानंतर या सीमावादाला सुरुवात झाली होती. कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरुंना लक्षात घेऊन हा मार्ग बांधण्यात आला आहे. भारताने नेपाळचा दावा त्यावेळीच फेटाळून लावला होता. त्यानंतर १८ जूनला नेपाळच्या संसदेमध्ये एक संवैधानिक दुरुस्ती करण्यात आली. ज्यात नवीन नकाशाला मंजुरी देण्यात आली. या नकाशामध्ये लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळच्या हद्दीमध्ये दाखवण्यात आले आहेत.
Esakal