
महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे.
5 तासांपूर्वी
कोल्हापूर – आजच्या घडीला जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडील संख्याबळ हे अडीशेच्या खाली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत हा आकडा आणखी वाढून 270 पर्यंत जाईल असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा: पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस; हवामानचा अंदाज
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इतर घटक पक्ष किंवा अपक्ष असतील या सर्वांचा निश्चितच मला पाठिंबा असणार आहे, त्यामुळे विजय निश्चित आमचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, मागीलवेळी झालेल्या निवडणूकीविषयी विचारले असता ते म्हणाले, गेली दोन वर्षे सातत्याने आम्ही सत्ताधारी म्हणून लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील नगरपालिका किंवा जिल्हा परिषद येथील सदस्यांचा विश्वास आम्ही संपादित केला आहे. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आजच्या घडीला महाविकास आघाडीचा आकडा अडीशेच्या खाली नाही. येत्या दोन दिवसात हा आकडा आणखी वाढून 270 पर्यंत जाईल असा मला विश्वास आहे. कागदावर पाहिले तर आम्ही सर्व महाविकास आघाडी एकत्र आहोत त्यामुळे विजय निश्चितपणे आमचाच होईल, असेही ते म्हणाले. यावेळी उच्च शिक्षण तंत्र मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पी. एन. पाटील हे उपस्थित होते.
हेही वाचा: “पहिली पत्नी लोकांसमोर येऊ नये म्हणून वानखेडेंनी…”; मलिकांचा आरोप
Esakal