आमदार सुनील भुसारा
sakal_logo

द्वारे

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : पालघर (Palghar) येथे नियोजन समितीच्या बैठकीत मोखाडा (mokhada) तालुक्यातील अनेक गावपाड्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा (Incomplete water supply scheme) मुद्दा आमदार सुनिल भुसारा (mla sunil bhusara) यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी कोचाळे पाणीपुरवठा योजना पूर्ण असल्याचा दावा केला. यावर आमदार भुसारा यांनी जर ती पाणीपुरवठा योजना पूर्ण केली असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली.

हेही वाचा: कल्याण : रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हा दाखल

त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. प्रांताधिकारी आणि पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांनी रातोरात त्या ठिकाणी पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी भुसारा यांनी थेट कोचाळे गावात जावून या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली आणि अपूर्ण नळयोजनेचा पर्दाफाश केला, आता अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भुसारांनी करत पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला.

कोचाळे, कारेगाव, बीएमसी कॉलनी च्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी  4  कोटी   75  लाखांचा  निधी मंजूर झाला. सदरचे काम सन  2014  मध्ये मंजुर होवून चालुही झाले. मात्र आज  8  वर्षानंतरही जलशुद्धीकरणाचा प्लांट याठिकाणी ऊभारलेला नाही. नळपाणीपुरवठ्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी  नादुरुस्त असुन ठीक ठीकाणी पाणी गळती होत आहे.  एवढेच काय तर आठ आठ दिवस नागरीकांना पाणी मिळत नाही.

हेही वाचा: डोंबिवली : खडेगोळवलीत दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कुठेही पाईपांना नळ लावलेले नाही. याशिवाय थेट बंधाऱ्यातुन नळाला पाणीपुरवठा केला जाणार असल्याने, बंधाऱ्याचे पाणी शुद्धीकरण न करताच प्यायला, याठिकाणी जनावरे राहतात काय असा सवाल भुसारा यांनी ऊपस्थित केला. पावणेपाच कोटीच्या या पाणीपुरवठा योजनेत जलशुद्धीकरण प्लांटचाही समावेश असताना आज आठ वर्षानंतरही ही नळयोजना अपुर्ण असल्याचा पर्दाफाश भुसारांनी केला आहे. अपूर्ण पाणीपुरवठा योजनेमुळे येथील ग्रामपंचायतीनेही ही योजना ताब्यात घेतलेल्या नाहीत.

जर ही पाणीपुरवठा योजना पूर्ण केली असेल तर मी राजीनामा देणार होतो आता पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता निवडुंगे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भुसारींनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या खोट्यामाहितीवरुन भुसारा हे चांगलेच आक्रमक झाले.  पाणीपुरवठा योजना अपूर्ण असताना तब्बल 3 कोटी  20 लाखांची बिले संबंधित कंत्राटदारास देण्यात आलेली आहे.  यामुळे जर हि पाणीपुरवठा योजना सदोष आहे तर सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी वाटेल ते करा मात्र हि योजना तात्काळ चालु करा असा सज्जड ईशारा वजा दम भुसारांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे.

येत्या अधिवेशनात कोचाळे गावाबरोबरच याभागातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा लक्षवेधी प्रश्न ऊपस्थित करणार असल्याचे आमदार भुसारांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, राष्ट्रवादी चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी कार्याध्यक्ष दिलीप जागले, रघुनाथ पवार आदि कार्यकर्ते तसेच कोचाळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भुसारा यांनी किनिस्ते येथील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here