
आज जागतिक मत्स्यदिनी ‘उजनी’ परिसरातील मच्छिमार संकटातच!
5 तासांपूर्वी
केत्तूर (सोलापूर) : आज 21 नोव्हेंबर हा ‘जागतिक मच्छिमार दिन’ (World Fishermen’s Day) म्हणून साजरा होत असताना, महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठे गोड्या पाण्यातील माशांचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या उजनी जलाशयावरील (Ujani Dam) मच्छिमार मात्र कमालीच्या संकटात सापडला आहे. व्यावसायिक मासेमारी, प्रदूषण व बेकायदेशीर परप्रांतीय मच्छिमारांच्या विळख्यात स्थानिक मच्छिमार सापडला आहे. त्यामुळे आज जवळपास 30 हजार मच्छिमार कुटुंबांवर उदरनिर्वाहाचे संकट उभा राहिले आहे.
हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार! विलिनीकरणाला ‘हा’ अडथळा
राज्यातील दोन नंबर पाणीसाठा असलेल्या उजनी जलाशयात गेली चाळीस वर्षे मासेमारीचा व्यवसाय सुरू आहे. मात्र 1995 सलापासून ठेकेदारी पद्घत अंमलात आल्यानंतर व पुढे 2008 साली मासेमारीचे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडून काढून ते जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्यापासून या मासेमारी व्यवसायाला घरघर लागली आहे.
शासकीय नियमाप्रमाणे जलाशयात दरवर्षी जवळपास एक कोटी मत्स्यबीज सोडणे बंधनकारक आहे; मात्र 13 वर्षात मत्स्यबीज सोडण्यात आलेच नाहीत, तर दुसऱ्या बाजूने, स्थनिक व परप्रांतीय मच्छिमारांच्या चढाओढीत लहान मासे मसरण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. परिणामी, उजनीतील मत्स्यसंपदा पूर्णपणे धोक्यात आली आहे. अनेक गावारान माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. यामध्ये वाम, चांभारी, रहू, कटला, काणस, मरळ, घोगऱ्या, वळज, टाकर, काब्रेल, ताबऱ्या, कोळीस, पानगट आदी जातींच्या माशांचे अस्तित्व केवळ नावापुरतेच राहिले आहे.
हेही वाचा: सोलापूरच्या केदार अन् विशालचे ‘अधुरी कहाणी’ गाणे ठरतेय हिट !
सध्या केवळ प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या चिलापी जातीच्या माशांवर मच्छिमारांची उपजीविका सुरू आहे. स्थानिक मच्छिमारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलने छेडली आहेत; मात्र याचा प्रश्न सुटण्याऐवजी तो सरकारच्या लाल फितीत अडकून पडला आहे.
Esakal