
5 तासांपूर्वी
मुंबई : येत्या २ ते ३ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावासाची (Maharashtra Weather Update) शक्यता आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश असून हवामान विभागाने (IMD) हा अंदाज वर्तविला आहे.
हेही वाचा: ग्रामपंचायत तरी तुमच्या ताब्यात आहे का? महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल
नोव्हेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी असते. मात्र, दिवाळीनंतर दोन ते तीन दिवस थंडीची चाहूल लागली. त्यानंतर सतत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी देखील कमी झाली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच गेल्या २४ तासांत कोकणासह राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. विदर्भात देखील पावसाच्या सरी बरसल्या होत्या. आज येत्या २ ते ३ तासांत कोकणासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, नाशिक, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावासाची शक्यता आहे. याबाबत हवामाने विभागाने ट्विट करून माहिती दिली आहे.
राज्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होत आहे, तर फळबागांना मात्र धोका आहे. सोलापूर जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण झालेले असते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्षांबरोबरच डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. सतत पडणारा हलक्या पावसाच्या सरीमुळे द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घडकुज होत असल्याने द्राक्ष बागांची मोठी हानी होत आहे.
Esakal