
आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं – मोहन भागवत
६ तासांपूर्वी
नवी दिल्ली : आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लाखो देशभक्तांनी बलिदान दिलं आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर आपण विभाजनाचं दुःख झेललं आहे. आपल्याला खंडित भारत मिळाला आहे. आता आपल्याला अखंडित भारत बनवायला हवा, हे आपलं राष्ट्रीय तसेच धार्मिक कर्तव्य आहे. या कर्तव्य मार्गावर चालल्यास आपला विजय असेल, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. राजधानी दिल्लीमधील एका शाळेत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत म्हणाले, “देशाचं विभाजन न मिटणारी वेदना आहे. ही वेदना तेव्हाच मिटेल जेव्हा विभाजन रद्द होईल. भारत एक जमिनीचा तुकडा नाही, आपली मातृभूमी आहे. संपूर्ण जगाला काही देण्यालायक आपण तेव्हाच बनू जेव्हा विभाजन रद्द होईल. हे राजकारण नाही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळं कोणीही सुखी झालेलं नाही. भारताची प्रवृत्ती वैविध्य स्विकारण्याची आहे. विभाजनवादी तत्वांच्या शक्तींमुळं देशाचं विभाजन झालं आहे. आम्ही विभाजनाचं दुःखदायक इतिहास आम्ही पुन्हा होऊ देणार नाही.
हेही वाचा: Corona Update : राज्यात नव्या 848 कोरोना रुग्णांची भर
भागवत पुढे म्हणाले, देशाचे कसे तुकडे झाले हा इतिहास वाचून पुढे जावं लागेल. विभाजनानंतरही देशात दंगली होत आहेत. स्वतःच्या सार्वभौमत्वाची स्वप्न पाहणं चुकीचं आहे. राजा सर्वांचा असतो. सर्वांची प्रगती त्याचा धर्म आहे.
हेही वाचा: पाटण आगारातून एसटी सेवा सुरु; पहिली फेरी पोलिस बंदोबस्तात!
हिंदू समाजाला संगठीत होण्याची गरज आहे. आपल्या सांस्कृतीक विविधतेत एकता आहे. त्यामुळे हिंदू हे म्हणू शकत नाही की, मुस्लीम राहू शकत नाहीत. शिस्तीचं पालन सर्वांनाच करावं लागेल. अशफाक उल्ला खान यांच्यासारख्या क्रांतीकारकांना स्वर्गाऐवजी भारतात पुन्हा जन्म घेण्याची इच्छा होती. अत्याचार थांबवण्यासाठी ताकदीसह सत्य गरजेचं आहे, असंही भागवत म्हणाले.
Esakal