
5 तासांपूर्वी
इचलकरंजी : एसटी बंद असल्याने गेली कित्येक दिवसांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतच आहे. अशातच परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अधिकच धोक्यात आले आहे. शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे धाकधूक वाढत आहे. मात्र गावातून शहरात जाण्यासाठी गैरसोयींचा डोंगरा आड येत आहे. आता परीक्षांच्या तोंडावर ग्रामीण विद्यार्थी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा आता शाळांवर अवलंबून असणार आहे.
दिवाळी सुट्टीच्या आधीच मुख्याध्यापक संघाकडून माध्यमिक शाळांच्या सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज्यशासनाने नियोजित दिवाळीची सुट्टी काही दिवस अगोदरच जाहीर केली.त्यामुळे सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या आणि एसटीचा संप सुरू झाला. पंधरा दिवस उलटूनही सद्या एसटी सेवा सुरु झाली नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. गावातून शहरात येण्यासाठी अडचणी भासू लागल्याने विद्यार्थी अद्यापही घरीच आहेत. तर काही विद्यार्थी अडचणीत मार्ग शोधत शाळेला येत आहेत.मात्र विद्यार्थ्यांना एसटविना गैरसोय वाढतच आहे.अशातच परीक्षेच्या तारखा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
इचलकरंजी शहरातील माध्यमिक शाळांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एसटी बंद काळात या शाळांमध्ये दैनंदिन विद्यार्थ्यांची गैरहजेरीचे प्रमाण अधिक आहे.अशा परिस्थितीत मुख्याध्यापक संघाने सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.29 नोव्हेंबरपासून इयत्ता पाचवी ते दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे.परीक्षेच्या नियोजनात शाळा गुंतल्या असून होणाऱ्या परीक्षांची मोठी झळ ग्रामीण विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक संघ ग्रामीण विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा पुढे ढकलणार हे पहावे लागणार आहे.मात्र परीक्षा होणार की नाही हे पूर्णतः शाळांवर अवलंबून असून शाळांचा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पालकांना दररोज नाही जमत
एसटी बंद कालावधीत ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरातील शाळांत सोडण्याची जबाबदारी पालकांवर आहे. मात्र दररोजची रोजंदारी यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत सोडणे पालकांना जमत नाही. परीक्षा कालावधीतही विद्यार्थ्यांना दररोज ग्रामीण भागातून शहरात येणे अडचणीचे आहे.
एसटी बंदमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी अडचण येतच आहे.सद्या परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत. त्याप्रमाणे नियोजन केले आहे. मात्र शाळांकडून परीक्षा पुढे ढकलण्यात बाबत प्रस्ताव आल्यास परीक्षा नक्कीच पुढे ढकलली जाईल.
सागर चुडाप्पा,चेअरमन,मुख्याध्यापक संघ परीक्षा विभाग
Esakal