
5 तासांपूर्वी
कर्जत (जि . अहमदनगर) : जिल्हा बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली. आज जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटिंगमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर साळुंके यांच्या समर्थकांनी कर्जत व तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करीत साळुंके कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण, मतदानाअगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपून राहिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात गद्दारी केलेल्या कर्जत तालुक्यातील स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. विजयाची खात्री असतानाही पराभवासाठी अप्रत्यक्षपणे घडवून आणलेल्या घडामोडींनी आमदार रोहित पवारांचीही निराशा झाली.
हेही वाचा: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी ‘फिल्डिंग’
एकाच गोटात राहून घडलेला सर्व नाट्यमय प्रकार पाहता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब साळुंके यांना निवडीबाबत शब्द दिला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देत ‘तज्ज्ञ संचालक’ म्हणून निवड करीत त्यांनी दिलेला शब्द पाळला. खऱ्या अर्थाने त्यांनी साळुंके यांना न्याय देऊन महाविकास आघाडी अधिक भक्कम केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही साळुंके यांच्या निवडीसाठी आग्रही भूमिका घेतली होती. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून साळुंके यांची निवड निश्चित केली. साळुंके यांच्या प्रामाणिक भूमिकेला आमदार पवार, उपमुख्यमंत्री पवार यांनी योग्य न्याय मिळवून दिला.
हेही वाचा: फ्लिपकार्टचा Black Friday सेल; iPhone 12 वर आहे बंपर डिस्काउंट
प्रामाणिक न्याय!
‘तज्ज्ञ संचालक’ म्हणून निवड केली, त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार यांचे आभार मानतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने योग्य न्याय मिळवून दिला, याचे खूप समाधान वाटते.
– बाळासाहेब साळुंके, नूतन तज्ज्ञ संचालक, जिल्हा बँक
Esakal