
5 तासांपूर्वी
मुंबई : बीडीडी चाळ प्रकल्पातील रहिवाशांना पुनर्विकासाठी करारपत्र कायदेशीर सुरक्षित करण्यात यावे. तसेच किमान 17 ते 25 लाखांचा कॉर्पस फंडची तरतूद करण्यात यावी अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी गुरुवारी (ता.25) वरळी येथील बीडीडी चाळीला भेट देऊन पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला.
वरळी येथील जांबोरी मैदान येथील आंबेमाता मंदिर येथे अधिकारी आणि बीडीडी रहिवासी यांची संयुक्त बैठक आठवले यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, टाटा कंपनीचे प्रकाश पाटील,रिपाइंचे बबन मोरे, किरण माने आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?
या आढावा बैठकीत आठवले यांनी रहिवाशांच्या मागण्यांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. टाटा कंपनी आणि राज्य सरकारने एकत्रितपणे राहिवाशांसाठी कॉर्पस फंडची तरतूद करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली. यावेळी राहिवसीयांच्या मागण्यांचा विचार करुन त्यांना पुनर्विकास प्रकल्पाचे लेआऊट दाखवावे. तसेच राहिवसीयांबरोबर होणारे करारपत्र नेमके काय आहे ते दाखवावे. तसेच रहिवाशांना विश्वासात घेऊन पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याची सूचना आठवले यांनी यावेळी केली.
बीडीडीचाळ पुनर्विकास करताना मोकळी मैदाने; गार्डन; शाळा; हॉस्पिटल यासाठी जागा उपलब्ध राहावी, यासाठी 42 माळ्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यात 5 लिफ्ट असतील. तसेच बीडीडी चाळ पुनर्विकासामध्ये पात्रता 1 जानेवारी 2021 पर्यंतची निश्चित करण्यात आल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू
बीडीडी चाळ पुनर्विकास करताना या भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा. तसेच 300 फुटांचे दोन आणि एक 600 फुटांचा हॉल उभारण्यात यावा अशी सूचना आठवले यांनी केली.
Esakal