
नवे निर्बंध! लस टोचून घ्या, अन्यथा फिरणे होईल मुश्कील
5 तासांपूर्वी
सोलापूर : जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 34 लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेणे अपेक्षित आहे. लसीकरण (Vaccination) सुरू होऊन 11 महिने होऊनही 28 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील दहा लाख 16 हजार 808 व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे पहिला डोस घेऊन 28 अथवा 84 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या अडीच लाख व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता कोरोना (Covid-19) लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यांच्या फिरण्यावर निर्बंध घातले जाणार असून, त्यासंबंधीचा आदेश दोन दिवसांत काढला जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांनी दिली.
हेही वाचा: ‘ओमीक्रोन’मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय बदलणार?
कोरोनाच्या दोन्ही लाटेतील दोन लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊन गेली असून त्यातील पाच हजारांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दोन्ही लाटेतील वाईट अनुभव पाठीशी असतानाही नागरिक प्रतिबंधित लस टोचून घेत नसल्याची धक्कादायक स्थिती समोर आली आहे. माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व माढा हे तालुके लसीकरणात पिछाडीवर आहेत. दुसरीकडे मोहोळ, सांगोला, माळशिरस, उत्तर सोलापूर या तालुक्यातील बहुतेक व्यक्ती दुसऱ्या डोससाठी पुढे येत नसल्याची स्थिती समोर आली आहे. लस न घेतलेल्यांची यादी तयार करून ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून घरोघरी लसीकरण सुरू केले आहे. तरीही, लस टोचून न घेणाऱ्यांना सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार नाही, दुकानातून माल तथा वस्तू खरेदी करतानाही त्यांच्याकडे लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले जाणार आहे. त्यासंबंधीचे नवे निर्बंध या आठवड्यात काढले जाणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी या निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाची सद्य:स्थिती…
-
एकूण उद्दिष्ट : 34,14,400
-
ग्रामीण मधेल लाभार्थी : २६,८०,०१७
-
लस न टोचलेल्या व्यक्ती : 7,75,251
-
शहरातील लाभार्थी : 7,34,383
-
लस न टोचलेल्या व्यक्ती : 2,41,557
गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ
लसीकरण सुरू झाल्यापासून ग्रामीणमधील 19 लाख चार हजार 766 तर शहरातील चार लाख 92 हजार 826 व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. त्यापैकी ग्रामीणमधील सहा लाख 11 हजार 108 तर शहरातील दोन लाख 59 हजार 912 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. मात्र, चिंतेची बाब अशी की, तब्बल अडीच लाख व्यक्तींनी दुसरा डोस घेण्याची वेळ आलेली असतानाही त्यांनी लस टोचून घेतलेली नाही. कोरोना गेला, लस घेतल्यावर त्रास होतो, लस घेतल्यानंतरही कोरोना होतोच, या गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची ओळख!
असे असतील निर्बंध…
-
लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहनातून करता येणार नाही प्रवास
-
मॉल अथवा दुकानांमध्ये खरेदीसाठी गेलेल्यांकडे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक
-
मॉल, दुकान तथा अन्य विक्रेत्यांनी दोन डोस न घेतल्यास त्यांचे दुकान ठेवावे लागणार बंद
-
मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना होणार दंड; लस न घेतलेल्यांना दुकानात प्रवेश दिल्यास कारवाई
Esakal