
लांजा; पुढारी वृत्तसेवा : सिमेंट घेऊन जाणार्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरून येणार्या इर्टीगा कारवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातग्रस्त दोन्ही वाहने आंजणारी पुलावरून 30 ते 35 फूट नदीपात्रात कोसळली. हा अपघात रविवारी रात्री 9 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलावर घडला. या भीषण अपघातात ट्रक चालक आणि कारमधील दोघे अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.
मृत ट्रकचालक हा लांजा तालुक्यातील पुनस येथील तर अपघातग्रस्त एर्टिगा कारमधील प्रवाशी हे चिपळूण तालुक्यातील रिक्टोली गावातील रहिवासी आहेत. रिक्टोली येथील असलेले शिंदे कुटुंबीय रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे चालले होते. तर ट्रकचालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. यादरम्यान आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक विजय सावंत यांना आपल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक फेल झाले असल्याने आणि याचदरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात लक्झरी गाड्यांची रहदारी असल्याने ट्रक थांबवायचा कसा असा मोठा प्रश्न ट्रक चालक सावंत यांच्यासमोर निर्माण झाला होता. तरीही मोठ्या
शिताफीने त्यांनी त्याही स्थितीत ट्रक आंजणारी पुलापर्यंत आणला. मात्र, सिमेंट भरले असल्याने आणि तीव्र उतार असल्याने समोर आलेल्या एर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून 30 ते 35 फूट नदीपात्रात खाली कोसळली. या भीषण अपघातातमध्ये ट्रक चालक विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकच्या क्लिनर याने जिवाच्या भीतीने ट्रकबाहेर उडी मारल्याने तो या अपघातातून बचावला.
ट्रकच्या जोरदार धडकेत एर्टिगा कार फरफटत आंजणारी पुलावरून ट्रकसोबत 35 फूट खोल नदीपात्रात कोसळली. ही धडक इतकी मोठी होती की कारचालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे (61) यांचा जागीच मृत्यू झाला. तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे (29) आणि वडील प्रदीप हिंमतराव शिंदे (वय 65) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी तसेच मृत प्रवाशांना लांजा पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.