
चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मशागतीची कामे खोळंबली आहेत. याशिवाय भात लावणीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. गेल्यावर्षी 1 ते 23 जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी एक हजार मि. मी. पाऊस झाला होता. तो यावर्षी याच कालावधीत 25 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकर्यांना चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
पाऊस लांबल्याने सुरुवातीला केलेली भात पेरणी अडचणीत येते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शेतकर्यांच्या सुदैवाने पावसाची सुरुवात झाली आणि भात बियाणे रुजले. परंतु, त्यानंतर करण्यात येणारी मशागत पावसाअभावी खोळंबली आहे. अजूनही पडलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला नाही किंवा नद्या-नाले दुथडी भरून एकदाही वाहलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी राजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे.
1 ते 23 जून या कालावधीत सरासरी 219 मि.मी. पाऊस झाला आहे. याच कालावधीत गेल्यावर्षी मात्र 1024 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यामुळे पंचवीस टक्क्याहून पर्जन्यवृष्टी कमी झाली आहे. याचा परिणाम भातपिकावर होणार आहे.
भात लावणीची कामे पंधरा ते वीस दिवस पुढे जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे. 1 जून ते 23 जून 2022 या कालावधीत सर्वात जास्त लांजामध्ये 409 मि.मी., रत्नागिरीमध्ये 271, गुहागरमध्ये 255, संगमेश्वरमध्ये 254, राजापूरमध्ये 202, दापोलीत 199, खेड 134, चिपळूण 128 तर मंडणगडमध्ये सर्वात कमी 120 मि.मी. पाऊस झाला आहे. याच कालावधीत गेल्यावर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये सरासरी 1024 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
त्यामुळे आगामी काळात पाऊस झाला नाही तर शेतकर्यांची कामे खोळंबणार आहेत. याचा परिणाम भातपिकावर होणार असून लावणीची कामे रखडणार आहेत. त्यामुळे शेतकरी राजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे. गेले दोन दिवस उत्तर रत्नागिरीत पाऊसच झालेला नाही. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असून आकाशात काळे ढग जमा झालेले नाहीत.