
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या योजनांना 145 कोटी 52 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यामध्ये 1 हजार 181 नळपाणी योजना मंजूर झाल्या आहेत.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा शासनाकडे सादर केलेल्या 1,181 नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांमुळे प्रत्येक गावात या योजना राबविण्यात येऊन पाण्याची कायमची समस्या मिटणार आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या पाणीपुरवठा योजनांमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नळ कनेक्शनवर पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रम गावागावात राबविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सन 2021-22 या आर्थिक वर्षात या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही योजना मार्गीही लागल्या आहेत.