रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : यावेळी 31 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एस. टी. महामंडळाने यंदा 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात 1300 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दि. 25 जूनपासून कोकणात जाणार्‍या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी शुक्रवारी दिली. कोकणात जाणार्‍या जास्तीत-जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री, अ‍ॅड. परब यांनी केले.

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव. किंबहुना, गणपती बाप्पा व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते. यंदा सुमारे 2500 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या गाड्यांचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईलव्दारे, खासगी बुकिंग एजंट व त्यांचे पवर उपलब्ध होणार आहे, असेही अ‍ॅड. परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here