
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून, अकरावी प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास अवधी असला तरी प्रवेशपूर्व तयारीची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. विविध दाखले काढण्यासाठी सेतू व ई-सेवा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे.
दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाची वर्षे आहेत. या दोन्ही बोर्ड परीक्षांचे निकाल लागले असल्याने लवकरच पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या अकरावी प्रवेश नोंदणी सुरू झाली असून, लवकरच प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची प्रवेश पूर्व तयारीची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशांसाठी लागणार्या आवश्यक कागदपत्रांची यादी बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी नोटीस बोर्डवर लावली आहे.
विद्यार्थी व पालकांनी या यादीप्रमाणे कादपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. प्रवेशासाठी आवश्यक विविध दाखले काढण्यासाठी सेतू तसेच महा ई-सेवा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे. वेळेआधीच दाखले मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या दाखल्यांच्या साक्षांकित प्रती काढण्यासाठी गर्दी होत आहे.
मागील महिन्यामध्ये उच्च शिक्षणासाठी लागणार्या विविध दाखल्यांची यादी तंत्रशिक्षण संचलनालयाने जाहीर केली होती. त्यामुळे बहुतांश पालकांनी निकालापूर्वीच दाखले मागणी अर्ज जमा केले आहेत. त्यामुळे दाखल्यांसाठी होणारे वादा-वादीचे प्रकार कमी झाले आहेत. दरम्यान, प्रवेश पूर्व तयारी सुरू असतानाच दुसरीकडे गुणपत्रकांची आस विद्यार्थ्यांना लागली आहे.
डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू…
दहावी, बारावी समक्ष असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशांसाठी इतर दाखल्यांबरोबरच दहावी गुणपत्रकही आवश्यक असते. मात्र, यावर्षी बहुतांश डिप्लोमा अभ्यासक्रमांना परीक्षेच्या रिसीटवरच प्रवेश नोंदणी केली गेल्याने निकाल लागताच ऑटोमेटिकली विद्यार्थ्यांचे गुणपत्रक अपलोड झाले आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेश इच्छुकांना गुणपत्रकासाठी वाट पहावी लागणार नाही.
हेही वाचा