
कणकवली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल 39 हजार 602 कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येणार आहेत.
हे स्मार्ट मीटर बसविल्यामुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळणार असल्याने महावितरणची वितरण हानी कमी होऊन महसुलात वाढ होईल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल 39 हजार 602 कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण रोहित्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मीटरिंग करण्यासाठी 11 हजार 105 कोटींची अंदाजित तरतूद करण्यात येणार आहे. यात सर्व वर्गवारीतील एकूण 1 कोटी 66 लाख ग्राहकांना तसेच 4 लाख 7 हजार वितरण रोहित्र तर 27 हजार 826 वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे या योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे.
राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे ग्राहकांना अपघातविरहित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग सोबतच वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे आणि वाहिन्यांना संवाद-योग्य आणि अत्याधुनिक मीटरींग सुविधा प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे. याशिवाय मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलाईन करणे आदी कामांसाठी 11 हजार 105 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे विजय सिंघल यांनी म्हटले आहे.
तसेच 25 केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची 2 लाख 30 हजार 820 वितरण रोहीत्रे आणि 27 हजार 826 वितरण वीजवाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर 2023 पर्यंत पुर्ण करावयाची आहे. याशिवाय मार्च 2025 पर्यंत वाणिज्यिक व तांत्रिक हानी 15 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील 55 लाख 38 हजार 585 वीज ग्राहकांकडेही हे स्मार्ट मीटर बसविले जाणार आहे.