
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील महसून विभागाच्या दोन अधिकार्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील मंत्र्यांनी आपल्या ताफ्यात घेतले आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण तहसीलदार जयराम सूर्यवंशी यांची ओएसडी म्हणून नियुक्ती केली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑफिस ऑन स्पेशल ड्युटीसाठी तहसीलदार सूर्यवंशी तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुशांत खांडेकर यांना पीए म्हणून घेतले आहे. गेल्या दिवसांपासून महसुलमधील त्या-त्या क्षेत्रातीमध्ये पारंग असलेल्या अधिकार्यांची चाचपणी करून या मंत्र्यांनी या अधिकार्यांना मागून घेतले आहे. राज्यात झालेल्या राजकीय भुकंपानंतर राज्यात शिवसेनेतील फुटलेल्या गटाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेना पक्षाचे चिन्ह कोणाचे हा वाद न्यायालयात असल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला होता. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला. या विस्तारामध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना उद्योगमंत्रीपद देण्यात आले. उदय सामंत यांनी जे मंत्रीपद मिळाले आहे, त्याची वेगळी आणि विकासात्मक ओळख महाराष्ट्राला झाली आहे. त्यांच्या कामाची पद्धतही गतीमान आहे. हा निपटारा होण्यासाठी त्यांचे अनेक पीए (स्वीय्य सहायक) आहेत. उद्योग मंत्रालयाकडे येणारी कामे अधिक गतीने व्हावी, यासाठी सामंत यांनी चिपळूणचे तहसीलदार जयराम सूर्यवंशी यांना ऑफिस ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) म्हणून घेतले आहे.
सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांना शालेय शिक्षणमंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्याकडेही राजकाराणाचा मोठा अनुभव आहे. हुशार व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनीही शिक्षण विभागाचा कामाला जास्तीत जास्त गती देण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. रत्नागिरीची निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना त्यांनी पीए म्हणून घेतले आहे. जिल्ह्यातील महसुल विभागातील महत्त्वाचे दोन अधिकारी गेल्याने महसूल विभागावर कामाचा ताण पडला आहे.