
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या निर्णयामुळे सणासुदीच्या पुढील महिन्यात एस. टी. कर्मचार्यांवर आर्थिक संक्रांत येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचार्यांचे पगार करायचे कसे, असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एस. टी. महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नसल्याची माहिती समोर आली आहे.
एस. टी. महामंडळाने प्रति महिना 450 कोटी रुपये उत्पन्न तर खर्च प्रति महिना 650 कोटी रुपये आहे. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रतिमहा पगारासाठी 310 कोटी, डिझेल 250 कोटी तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रुपये खर्च होतो. एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रुपये निधी मिळत असल्याने उर्वरित 200 कोटी रुपये आणायचे कुठून, असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.