अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून चाकरमान्यांना दिलासा देणारी ही बातमी दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे. अटी शर्ती आणि नियमांचं पालन करूनच ही व्यवस्था करून देण्यात येणार असून एसटीने कोकणात जाण्यासाठी काय नियम असतील याची माहिती लवकरच देण्यात येईल, असं अनिल परब यांनी सांगितलं. कोकणात मोठ्या प्रमामावर साजरा केला जातो. यंदा करोनाचं सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील विविध भागातील चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातोच त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही आयसीएमआरच्या गाईडलाइन मागवल्या असून या सर्व गोष्टींचा अभ्यास करून चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असं ते म्हणाले.
कोकणात गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा होईल. गर्दी होणार नाही आणि पर्यायाने कोकणात करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबतही विचार करण्यात येत आहे. कोकणातील ज्या लोकांची घरे बंद असतात आणि जे गणेशोत्सवासाठीच कोकणात जातात त्यांना कोकणात पाठवण्याची जबाबदारी सरकार घेईल, असंही ते म्हणाले. तसेच एका दिवसासाठी आणि पाच दिवसांसाठी कोकणात जाणारेही शेकडो चाकरमानी आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा. याचा विचार करत आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंडळांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गणेशोत्सवाबाबत सरकारने वेळकाढू भूमिका घेतलेली नाही, असं सांगतानाच मुंबई, ठाणे, पुण्यातून कोकणात जाणारे लोकही आमचेच असून कोकणातील लोकही आमचेच आहे. या सर्वांची काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्य असून त्यानुषंगाने सरकार निर्णय घेत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times