पुणे: सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. पण खूप कमी जणांचं स्वप्न पूर्ण होतात. सैनिक होण्याचा प्रवास सोपा नसतो. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते. काही हुशार मुलांना अनेक चांगल्या ठिकाणी संधी मिळत असते. मात्र तरीही ते लष्कराची वाट निवडतात. सुखासुखी आयुष्याऐवजी खडतर वाटेनं चालतात. राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतून नुकताच सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झालेला गौरव यादव हा अशा तरुणांपैकीच एक.

राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील जारोर बास गावचा गौरव यादव खडकवासला येथे असलेल्या एनडीएमधून उत्तीर्ण झाला. राष्ट्रपती सुवर्ण पदकानं त्याचा सन्मान करण्यात आला. लेकाचा सन्मान पाहून आई, वडिलांचे डोळे पाणावले. भावाचा ऊर अभिमानानं भरून आला. गौरव यादव आयआयटीची प्रवेश परीक्षा पास झाला होता. मात्र त्यानं परीक्षेचा निकाल कुटुंबापासून लपवला. एनडीएमध्ये प्रवेश घ्यायचा आणि देशसेवा करायची याच ध्येयानं प्रेरित झालेल्या गौरवनं जीवतोड मेहनत केली.
झालं गेलं विसरू! पतीचा पत्नीला शब्द, पण मंदिरात जाताना अप’घात’ झाला; मामला २ कोटींचा निघाला
गौरव दोनदा एनडीएची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखतीत त्याला अपयश आलं. त्यानंतरही गौरवनं जिद्द सोडली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळालं. ‘मी माझ्या खोलीतील भिंतीसमोर उभा राहायचो. माझ्यासमोर एलएसबीचं पॅनल बसलंय अशी कल्पना करायचो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचो,’ असं गौरवनं सांगितलं.

गौरवचा भाऊ विनीतदेखील लष्करात देशसेवा करत आहे. एक वेळ अशी होती की आम्ही सगळेच गौरवच्या मानसिक स्थितीमुळे काळजीत होतो, अशी आठवण विनीतनं सांगितली. मी एकदा गौरवला आयआयटीच्या निकालाबद्दल विचारलं होतं. त्यावेळी त्यानं अनुत्तीर्ण झाल्याचं सांगितलं होतं. त्यानं सांगितलं आणि मी विश्वास ठेवला. एनडीएसाठी निवड झाल्यानंतर त्यानं आम्हाला आयआयटीची प्रवेश परीक्षादेखील पास झाल्याचं सांगितलं, अशा शब्दांत विनीतनं गौरवचा प्रवास उलगडला.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या ‘लक्ष्मी’नं प्राण सोडला; अंत्यदर्शनाला हजारोंची गर्दी; सगळेच भावुक
एनडीएमधील प्रशिक्षण सुवर्ण पदकासह पूर्ण करून गौरवनं मोठी कामगिरी केली आहे. आम्हा सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटतो. त्याची लष्करी कारकिर्दीची सोनेरी सुरुवात झाली आहे, अशा शब्दांत विनीतनं गौरवचं कौतुक केलं. त्यावेळी त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला होता. एनडीए प्रशिक्षणादरम्यान गौरवची कामगिरी दिमाखदार झाली. सर्वच आघाड्यांवर त्यानं उत्तम यश मिळवलं.

सुवर्ण पदक मिळेल याचा विचार मी कधीच केला नव्हता. अभ्यासक्रम आणि लष्करी प्रशिक्षण यांचा ताळमेळ साधताना मी सुरुवातीला कमी पडत होतो. पण मी स्वत:ला प्रोत्साहन दिलं, अशा शब्दांत गौरवनं त्याच्या यशाचं गमक सांगितलं. केरळ पब्लिक स्कूलमधून ए प्लस ग्रेडसह उत्तीर्ण झालेल्या गौरवला बारावीत ९६ टक्के गुण मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here