काय आहेत तुकाराम मुंढेंच्या बदलीची कारणं?
तुकाराम मुंढे पुढची धोरणं आखत असतानाच त्यांच्या बदलीचा आदेशही आला. आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीची जी कारणं सांगितली जातायत ती सुद्धा तशीच आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तुकाराम मुंढेंनी करोना काळातील गैरव्यवहाराची माहिती मागवल्याची चर्चा आहे. सरकारी डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर मर्यादा आणून जास्तीत जास्त सरकारी सेवेची सक्ती त्यांनी केली. रेफरल म्हणजेच सरकारी रुग्णालयातल्या पेशंटला खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यावर बंदी आणण्यात आली आणि यामुळे खाजगी दवाखान्यांचे धाबे दणाणले. खाजगी दवाखान्यातल्या औषधांऐवजी सरकारी रुग्णालयातलीच औषधं देण्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले. कोणत्या सरकारी डॉक्टरांचे नातेवाईक खाजगी दवाखाने चालवतात याचीही फाईल मागवल्याची माहिती आहे. रेफरल बंद करण्याच्या दृष्टीने हे मोठं पाऊल मानलं जात होतं आणि हाच निर्णय तुकाराम मुंढेंची अडचण वाढवणारा ठरला का, असा प्रश्न उपस्थित होतो.
आरोग्य क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, तुकाराम मुंढेंनी ही माहिती मागवली आणि लॉबी सक्रिय झाली. खाजगी दवाखान्यांना या निर्णयामुळे मोठा फटका बसू शकला असता, असंही सांगितलं जातंय. तुकाराम मुंढेंच्या बदलीत आपला कोणताही सहभाग नसल्याचं सांगून आरोग्यमंत्र्यांनी तर हा विषय त्यांच्या बाजूने संपवलाय, पण खाजगी दवाखाने परवडत नसल्यामुळे कायम सरकारी दवाखान्यातच जाणारे रुग्ण अजूनही तुकाराम मुंढेंच्या बदलीमुळे चक्रावून गेले आहेत. सरकारने जर एखाद्या लॉबीमुळे तुकाराम मुंढेंसारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली असेल तर ते सर्वात मोठं आपल्या आरोग्य व्यवस्थेचं नुकसान ठरू शकतं. कारण, तुकाराम मुंढेंचे सरकारी दवाखान्यातले दौरे पाहून इथेही आता खाजगीसारखीच सुविधा मिळेल याबाबत रुग्ण निश्चिंत झाले होते आणि त्यापूर्वीच बदलीचा आदेश निघाला आहे.