पुणे( दौंड): छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आपल्या प्रत्येकावर असल्याचे आपण अनेकदा पाहतो. तसे प्रत्यय देखील आपल्याला येतात. छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करताना आपण पाहतो. असाच एक प्रयोग पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी या पठ्ठ्याने थेट किल्ल्याच्या आकाराचे घराचं बांधले आहे. दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात हा प्रयोग करण्यात आला आहे. हे घर सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. निलेश पंढरीनाथ जगताप असे त्या युवकाचे नाव असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी हे घर बांधले आहे.

निलेश जगताप हे शेतकरी कुटुंबातील असून तो व्यवसायाने पशुवैद्य आहे. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारचा हा बहुधा पहिला प्रयोग असावा. किल्ल्याची प्रतिकृती या शिवप्रेमी असलेल्या युवकाने तयार केली आहे. घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणारा चिरा जांभा दगड लावण्यात आला आहे. निलेश यांनी हा दगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथून आणला असून त्या घराच्या चारही बाजूंना बुरुंजाचा आकार देण्यात आला आहे. तसेच प्रवेश द्वारा जवळ स्वागत कमान देखील बांधण्यात आली आहे. बाहेरच्या बाजुला कंदीलाच्या आकारांचे दिवे लावण्यात आले आहेत. तसेच घराच्या बाजूने बाग देखील फुलवण्यात आली आहे.

या घराचा दरवाजा हा महाकाय बनवण्यात आला आहे. तसेच महाराजांच्या काळात असणारे पारंपारिक तुळशी वृंदावन देखील उभारण्यात आले आहे. हे घर जवळपास २५७७ स्वकेर फुटमध्ये बांधण्यात आले आहे. घराच्या आतमध्ये देवघर, सभागृह, ३ बेड,किचन,स्टोअर रुम,बाथरुम एखाद्या पंचतारांकीत हॉटेलमधील वास्तूप्रमाणे बांधण्यात आल्या आहेत. किचनमध्ये धुर बाहेर जाण्यासाठी आयलॅंड चिमणी व अत्याधुनिक बेल कॅमेरा बसवण्यात आला आहे.

Fort 2

घर बांधायला १ कोटींचा खर्च

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा भक्त आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा यासाठी माझ्या डोक्यात घर बांधण्याची संकल्पना आली. हे घर बांधण्यासाठी जवळपास १ कोटी रुपये इतका खर्च आला असून हे बांधायला दोन वर्षांचा कालावधी लागला. तसेच या घराला आतून सर्व पारंपारिक वाड्यासारखा लूक देण्यात आला असून घराचे छत उतारासारखे करण्यात आला आहे. मला लहान पणापासून किल्ले बनवण्याची , किल्ल्यांवर फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे लहान पणापासूनच महाराजांच्या विचारांचा वारसा असल्याने मी हे घर बांधले आहे.

हे घर बांधण्याचा उद्देश एवढाच आहे की, येणाऱ्या पिढ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवावा आणि शिवाजी महाराजांचा विचार पुढे चालवा हा या मागचा उद्देश आहे. ही वास्तू मी पंचतारांकित वास्तूप्रमाणे तयार केली असून छत्रपतींचा वारसा यातून जपला जाणारा असल्याचे निलेश जगताप यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here