Maharashtra Karnataka Border issue | बेळगावमध्ये महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत कर्नाटक सरकारला इशारा दिला. बेळगावमधील मराठी भाषिक दहशतीखाली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती सामान्य करण्याची गरज आहे

हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील जनतेती भूमिका ही संयमाची आहे
- हा देशाच्या ऐक्याला धोका आहे
- केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही
मी अजूनही सांगतोय, महाराष्ट्रातील जनतेती भूमिका ही संयमाची आहे. त्याला मर्यादा येऊ नयेत, हीच माझी इच्छा आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्रीच चिथावणी देऊन हल्ले घडवत असतील तर हा देशाच्या ऐक्याला धोका आहे. हे काम कर्नाटकात होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा महाराष्ट्रातील खासदारांनी ही गोष्टी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घातली पाहिजे. अन्यथा उद्या महाराष्ट्रात कोणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
आजचा दिवस खऱ्या अर्थाने संविधान ज्यांनी लिहले आहे, सर्व भाषिक लोकांना समान अधिकार दिला, त्या पुण्यमहात्म्याचे स्मरण करण्याचा आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर घडलेला प्रकार निषेधार्ह असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गेल्या आठवड्यापासून एका वेगळ्या स्वरुपात नेण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे. त्यांनी जत आणि अक्कलकोट संदर्भात जी काही भूमिका मांडली आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असे म्हटले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वापरण्यात येत असलेल्या भाषेमुळे सीमाभागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. मी गेली अनेक वर्षे सीमाप्रश्न जवळून बघितला आहे. माझा या गोष्टीचा अभ्यास आहे. त्यामुळे असं काही घडतं तेव्हा सीमाभागातील लोक माझ्याशी संपर्क साधतात. त्यांच्याकडून माझ्यापर्यंत जी माहिती आली आहे, ती चिंताजनक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांकडून मला सतत मेसेज पाठवले जात आहेत. बेळगावमधील परिस्थिती अतिश्य गंभीर आहे. समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी केली जात आहे, त्यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरु आहे. तेथील मराठी भाषिक या सगळ्या परिस्थितीला तोंड देत असून ते सध्या दहशतीखाली जगत आहेत.
अशा परिस्थितीत तुम्ही कोणीतरी येऊन आम्हाला धीर द्यावा, अशी तेथील मराठी जनांची अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. ही तेथील समस्त मराठी भाषिकांची भूमिका आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती सामान्य करण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.