Maharashtra Karnataka border | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावरुन शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला होता.

 

Basavraj Bommai and Eknath Shinde
बसवराज बोम्मई आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • सीमाभागात शांतता राहावी, यावर एकमत
  • एकीकडे सामोपचाराची भाषा करायची आणि दुसरीकडे डिवचायचे
  • मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार का?
मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा मुद्दा तापल्यामुळे गेल्या काही तासांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. कर्नाटकमध्ये मंगळवारी महाराष्ट्रातील वाहनांना कन्नड वेदिका रक्षणच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले होते. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने फोनवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना आपल्यालाही सीमाभागात शांतता हवी असल्याचे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. परंतु, ही चर्चा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट केले. यामध्ये बोम्मई यांनी आपली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याचे सांगितले. दोन्ही राज्यांमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था असावी, यावर आमचे एकमत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सलोख्याचे वातावरण राहणार असले तरी सीमभागाबाबत आमची भूमिका तसूभरही बदललेली नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात याबाबतची कायदेशीर लढाई लढू, असे बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हे म्हणजे एका बाजूला सामोपचाराची भाषा करायची आणि दुसरीकडे डिवचायचे, असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमावादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आज संसदेत ठाकरे गटाचे खासदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.यावेळी ते कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तक्रार करू शकतात. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार का, हे पाहावे लागेल.

देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्यापुढे बाजू मांडणार

बेळगावमध्ये घडलेल्या घटनांबाबत माझे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. अशा घटना घडविणाऱ्यांना सरकार पाठिशी घालणार नसल्याचे आश्वासन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी संपूर्ण स्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपण सांगणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शरद पवारांचा कर्नाटक सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम

येत्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात होणारे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राने आतापर्यंत राखून ठेवलेल्या संयमाची जागा वेगळी गोष्ट घेऊ शकते. मग त्यानंतर जे काही होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्रीच चिथावणी देऊन हल्ले घडवत असतील तर हा देशाच्या ऐक्याला धोका आहे. हे काम कर्नाटकात होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here